महाराष्ट्र 14 न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 25 ऑक्टोबर रोजी देखील त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. आज धम्मचक्र प्रवर्तण दिन आणि दसऱ्याच्या मुहुर्तावर मोदींनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, सणांमध्ये सीमेवर असलेल्या सैनिकांनाही लक्षात ठेवा. आम्हाला प्रत्येक घरात या वीर जवानांच्या सन्मानासाठी एक दिवा लावायचा आहे.
यावेळी पंतप्रधान मोदींनी पोन मरियप्पन यांच्याशी संवाद साधला. ते तामिळनाडूतील तुतुकुडीमध्ये एक सलून चालवतात, त्यांनी त्यांच्या सलूनचा एक भाग पुस्तकालयात परिवर्तीत केला आहे. पंतप्रधानांनी पोन यांच्याशी तामिळ भाषेत संवाद साधला. तसेच यंदा खरेदी करताना लोकल फॉर व्हॉकलला लक्षात ठेवा, कोरोना काळात सतर्कता बाळगा, स्वदेशीला प्राधान्य द्या, असेही आवाहन त्यांनी केले.
पुढच्या काही दिवसात अनेक उत्सव येणार आहेत. ईद आहे, कोजागिरी पौर्णिमा आहे, वाल्मिकी जयंती आहे, मग, धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, छट पूजा, गुरू नानक देवजी जयंती आहे. कोरोनाच्या या संकटकाळात, आम्हाला संयमानंच वागावं लागणार आहे, मर्यादेतच रहावं लागणार आहे, असेही ते पुढे बोलताना म्हणाले. पंतप्रधान मोदींनी शनिवारी त्यांच्या ट्विटरवरुन ट्वीट करत नागरिकांना आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्याचं आवाहन केलं होतं. तसेच, त्यांनी नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छाही दिल्या.
7 Comments