महाराष्ट्र 14 न्यूज : कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. जोरदार पावसानं शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुसरीकडे केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. मनमाड-बाजार समितीत कांद्याचा लिलाव बेमुदत बंद करण्यात आला आहे. तर पिंपळगाव-बसवंतमध्येही व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव रद्द केले आहेत.
केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्यामुळे व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्यास असमर्थता दाखवली आहे. लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. खरेदी केलेला कांदा पडून असल्याचंही व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. लिलावात सहभागी होणार नसल्याचंही व्यापाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी कांदा उत्पादकांनी लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले होते. कांदा साठवणुकीवर निर्बंध घातल्यामुळे व्यापाऱ्यांनीच कांद्याचे लिलाव बंद केले आहेत. केंद्राने अवघ्या 25 टनापर्यंत कांद्याला साठवणीकरता परवानगी दिली आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
कांद्याचे भाव वाढल्यामुळे साठवणुकीवर मर्यादा घालण्यात आली आहे. खरंतर, देशातील बर्याच भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कांदासुद्धा येत्या काळात सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणणार आहे. जर कांद्याचे भाव सध्याच्या गतीने वाढत राहिले तर यंदा दिवाळीत कांद्याचे दर खूपच भडकू शकतात. किरकोळ बाजारात सध्या कांदा 40-50 रुपये किलोनं मिळतोय. देशातील सर्वात मोठा कांदा बाजार असलेल्या नाशिकमधील लासलगाव येथे गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याचा भाव प्रति क्विंटल 6802 रुपयांवर पोहोचला होता. कांद्याचा हा सर्वाधिक भाव आहे. येत्या काही दिवसांत किरकोळ बाजारात कांद्याचे दर 100 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कांदा महाग का होत आहे?
महाराष्ट्रातील लासलगावात चांगल्या कांद्याचा बाजारभाव दर क्विंटल 6 हजार 802 रुपयांवर पोहोचला. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बर्याच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतात कांद्याचे पीक नष्ट झाले आहे, त्यामुळे कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
100 Comments