महाराष्ट्र 14 न्यूज : श्रावण पौर्णिमा ही राखी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. बहीण-भावांमधील स्नेह वाढवणारा दिवस. चातुर्मास सुरू झाला की, वेध लागतात ते श्रावणाचे आणि श्रावण सुरू झाला की, ओढ लागते ती रक्षाबंधनाची. नववर्ष सुरू झाले की, विविध सण-उत्सवांची मनातल्या मनात उजळणी सुरू होते. त्यात आघाडीवर असलेला सण म्हणजे राखी पौर्णिमा. भावाला राखी बांधताना लक्ष्मी देवी आणि श्रीविष्णूंकडे प्रार्थना करावी, असे सांगितले जाते.
भावाला दीर्घायुष्य मिळावे, यासाठी बहीण प्रार्थना करते. तर बहिणीला वस्त्राभुषणाची भेट देऊन तिला सुख, शांतता, सौभाग्य, समृद्धी प्राप्त व्हावी, यासाठी भाऊराया प्रार्थना करतो. रक्षाबंधनाचा सण भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा मानला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर किंवा शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात मनापासून प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते, अशी मान्यता आहे. सन २०२० मध्ये सोमवार, ०३ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा आहे. या दिवशी श्रावणी सोमवार असल्यामुळे महादेव शिवशंकरांना एक राखी अर्पण करणे शुभलाभदायक ठरते, असे सांगितले जाते. मात्र, रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना शुभ मुहूर्त किंवा शुभ कालावधी पाहून औक्षण करावे. जाणून घेऊया…
रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त ९ वाजून २५ मिनिटांनी सुरू होणार असून ११ वाजून २८ मिनिटांपर्यंत असेल, तर ज्यांना संध्याकाळच्यावेळी राखी बांधायची आहे. त्यांच्यासाठी ३ वाजून ५० मिनिटांपासून ५ वाजून १५ मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त असेल.
या कालावधीत राखी बांधू नका: सकाळी ५ वाजून ४४ मिनिटांपासून ९ वाजून २५ मिनिटांपर्यंत अशुभ वेळ आहे. या कालावधीत राखी बांधणं टाळा.
याशिवाय सकाळी ७ वाजून २५ मिनिटांपासून ९ वाजून ५ मिनिटांपर्यंत अशुभ वेळ असणार आहे. या कालावधीत राखी बांधू नका. कारण यावेळात राहू काळ असणार आहे.
11 Comments