महाराष्ट्र 14 न्यूज : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील दहिवड येथे सुप्रसिद्ध चोरचावडी धबधबा आहे. जिल्ह्यात होणाऱ्या पावसामुळे सध्या चोरचावडी धबधबा ओसांडून वाहत आहे. येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने चांदवडच्या वडाळीभोई येथील पाच मित्र सहलीसाठी धबधब्यावर आले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे शुभम गुजर आणि ऋषिकेश तोटे या दोघांचा बुडून मृत्यू झाला. शेवटी गावकऱ्यांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. पुढील तपास देवळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंडकर आणि सहकारी करत आहेत.
चांदवड तालुक्यातील वडाळीभुई येथील अजिंक्य जाधव, संकेत जाधव, सागर जाधव, शुभम गुजर, ऋषिकेश तोटे हे पाच मित्र चोरचावडी धबधबा परिसरात पर्यटनासाठी आले होते. पाचही जण धबधब्याच्या पाण्यात पोहोण्यासाठी उतरले. पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्यानं पाचही जण बुडू लागले. पाचपैकी अजिंक्य, सागर आणि संकेत या तिघांना बऱ्यापैकी पोहोता येत होतं. तिघे पाण्याबाहेर आले. मात्र, शुभम व ऋषिकेश या दोघांना मात्र जलसमाधी मिळाली. दोघांना शोधण्यासाठी गावातील पट्टीच्या पोहोणाऱ्यांना पाचारण करण्यात आले. दोन्ही मित्रांचा पाण्यात शोध घेण्यात आला. दोघे मित्र सापडले तेव्हा ते एकमेकांच्या मिठीत होते. शुभम आणि ऋषिकेश एकमेकांचा बचाव करताचा प्रयत्न करत असावेत, असं पोहोणाऱ्यानी सांगितलं. दोघांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आहे.
124 Comments