महाराष्ट्र 14 न्यूज : मागिल काही दिवसात अनेक मुद्यांवरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे पाहण्यास मिळाले आहे. आता पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळावरून महाविकास आघाडीतच जुंपण्याची शक्यता आहे. या विमानतळावरून शिवसेनेच्या नेत्याने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधल्याने हा मुद्दा चर्चेत आला आहे. पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाला स्थानिकांचा विरोध तर आहेच. मात्र आता हे विमानतळ बारामतीला हलवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे.
पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा बदलून ते बारामतीच्या सीमेजवळ नेऊन ठेवणं हे मोठं षडयंत्र असल्याचा आरोप करत शिवतारे यांनी थेट पवारांवर निशाणा साधला आहे. हे विमानतळ बारामतीला हलवण्याचा कुठलाही निर्णय झाल्यास मोठं आंदोलन करू, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. या विमानतळाची आधीची जागा बदलून नव्याने तालुक्यातील काही गावांची जागा घेऊन विमानतळाचे प्रवेशद्वार बारामतीच्या बाजूला करून विकास साधेल. तर विमानतळाच्यामागे पुरंदरमध्ये झोपडपट्टी होणार. त्यामुळे हे षडयंत्र आपण जनतेला बरोबर घेऊन हाणून पाडण्यास सिद्ध आहोत, असा इशारा शिवतारे यांनी दिला आहे.
प्रस्तावित विमानतळाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध
पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाला पुन्हा स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील रिसे, पिसे, राजुरी, पांडेश्वर, नायगाव, नावडी, पिंपरी या परिसरात विमानतळ होत असल्याच्या चर्चा आहेत. कोणत्याही परिस्थितीत विमानतळासाठी जमिनी देणार नाही, अशी ठाम भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. यासाठी शनिवारी राजुरी इथं सर्व शेतकऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी शेतकऱ्यांनी प्रस्तावित विमानतळाला विरोध दर्शवला आहे.
102 Comments