महाराष्ट्र 14 न्यूज : रहाटणी, काळेवाडी फाटा परिसरातील हा भाग कामगार, बिगारी मजूर अड्डा म्हणून ओळखला जातो. कामाच्या शोधात अनेक तरुण सकाळच्या वेळेत येथे गर्दी करतात; परंतु लॉकडाऊनमुळे कामच मिळत नसल्याने अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत.
शंभर दीडशे रुपये कमी द्या..; पण, काम द्या…
अशी आर्जव या ठिकाणी ऐकायला मिळत आहे.
करोनाच्या संकटामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. तसेच, व्यापार-उद्योग ठप्प झाल्याने व्यावसायिकही हवालदिल झाले आहेत. लॉकडाऊनमध्ये गावाकडे गेलेले मजूर आता शहर, उपनगरांकडे रोजगारांसाठी पुन्हा येऊ लागले आहेत. यातून बेरोजगारांची संख्या अधिक झाली आहे.
प्लबिंग, वेल्डर, सुतार, गवंडी, स्वच्छता कामगार, शेतातील कामासह हमाली, बिगारीसाठी स्त्री-पुरुष मजूर अड्ड्यावर मिळतात. कमी रोजंदारीवर काम करण्याचीही त्यांची तयारी असते; परंतु, बेरोजगारांना काम मिळत नसल्याने मजूर अड्ड्यावर दिवसभर गर्दी असते. रहाटणी फाटा परिसरातील चौकाचौकातील मजूर अड्ड्यावर असे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
पाच ते सहा जणांचे कुटुंब चालविण्यासाठी किमान ५०० रुपये तरी दररोज मिळणे गरजेचे आहे. परंतु, कामच नसल्याने बेरोजगार तरुण हवालदिल झाले आहेत. हे तरुण सकाळी ०७.०० पासून दुपारी ०१.३०वाजेपर्यंत काम मिळेल, या आशेने मजूर अड्ड्यावर थांबलेले असतात. काम मिळालेच तर पुरुष मजुरास ६०० व महिला मजुरास ५०० रुपये आठ तासांचे मिळतात. यात ठेकेदाराचे कमिशन वेगळे असल्याने हातात ३०० ते ४०० रुपयेच पडतात. परंतु, ठेकेदाराकडे रोज कामासाठी जायचे असल्याने तक्रार तरी कोणाकडे करणार? असा प्रश्न मजुरी करणाऱ्यांपुढे आहे.
29 Comments