महाराष्ट्र 14 न्यूज : बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती या गावात २४ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा न बसविल्यास मंगळवारी महाराष्ट्रातील कवळी कट्टी ते मनगुत्ती पर्यंत दांडी मार्च काढण्याचा इशारा कोल्हापुरातील शिवसैनिकांनी दिला होता. मात्र आद्यपही शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला नसल्याने आज सकाळी कोल्हापुरातून शिवसैनिक कर्नाटकातील मनगुत्ती गावाकडे रवाना झाले आहेत.
या गावात १५ दिवसात शिवाजी महाराजांच्यासह पाच व्यक्तींचे पुतळे तातडीने बसवण्याचे आश्वासन कर्नाटक सरकारने दिले होते. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते. आश्वासन देऊन पंधरा दिवस पूर्ण झाले तरी प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे आता महाराष्ट्रातील शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे. असंख्य शिवसैनिक कोल्हापुरातून मनगुत्तीकडे रवाना झाले आहे. हे आक्रमक शिवसैनिक कर्नाटक प्रशासनाला जाब विचारणार आहेत.
दरम्यान, शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा बघता कर्नाटक पोलिसांनी राज्याच्या सीमेवर चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच मनगुत्ती गावाच्या प्रवेशद्वारावरसुद्धा मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मणगुत्ती गावात जाणाऱ्यांची कसून चौकशी केल्यानंतरच गावात जाण्याची परवानगी दिली अजात आहे. महाराष्ट्र पासिंगची वाहने पोलिसांनी अडवून ठेवली आहे. मनगुत्ती गावातील व्यक्ती सोडून अन्य कुठल्याही व्यक्तींना गावात जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहे.
12 Comments