महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यातील माध्यमिक शाळांतील इयत्ता 5 वी चा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्यात येणार व इयत्ता 5 वी वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांचे समायोजन प्राथमिक शाळांमध्ये केले जाणार आहे. याबाबत काल शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जाहीर करून सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता प्राथमिक शाळा ही इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीपर्यंत असणार आहे. तर माध्यमिक शाळेचा प्रवेश आता इयत्ता सहावीपासून घेता येणार आहे.
याआधी राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 5 वी, इयत्ता 6 वी ते 8 वी व 9 वी ते 10 वी अशा तीन गटांमध्ये विद्यार्थी विभागले गेले होते. यामध्ये इयत्ता 5 वी हा एकाच वर्गाचा स्वतंत्र गट तयार झालेला होता. या गटाला माध्यमिक शाळांमध्ये प्राथमिक शाळांचे शिक्षक कार्यरत होते. त्यामुळे आता या शिक्षकांचा समायोजन हे प्राथमिक शाळांमध्ये केलं जाईल. आरटीई अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार ग्रामीण भागात, वाड्या, वस्ती या ठिकाणी इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यत शिक्षण 1 किमी परिसरात देणे आवश्यक आहे.
त्यामुळे इयत्ता 5 वी हा वर्ग प्राथमिक शाळांना जोडणे अधिक संयुक्तिक ठरणार आहे. त्यामुळे 5 वी च्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात सुद्धा कमी प्रवास करून घरच्या जवळ शाळा उपलब्ध करून इयत्ता 5 वी पर्यंत शिक्षण घेता येणार आहे. इयत्ता 5 वी वर्ग प्राथमिक शाळांमध्ये जोडताना हे काम टप्याटप्याने व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या नियंत्रणाखाली केलं जाईल. शिवाय, इयत्ता 5 वर्गाला प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचे समायोजन जवळच्याच प्राथमिक शाळेत करण्यात यावे, अशा सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत.
3 Comments