महाराष्ट्र 14 न्यूज : कंगना रणौत प्रकरणावर राज्यात वादळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पक्षाची पुढची दिशा आणि रणनीती काय राहिल हे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत पक्षासंदर्भात चर्चा झाली. सोनिया, पवार नाराज असल्याची अफवा पसरवू नका, असं काहीही नाही. कंगना हा विषय आमच्यासाठी संपला आहे, आम्ही ते विसरून गेलोय. आम्ही आमच्या नेहमीच्या सामाजिक, राजकीय कामाला लागलोय. ती काय ट्विट करतंय ते वाचले नाही, आम्ही फक्त सामना वाचतो. असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावरून पवारांनी बुधवारी दिलेला सल्ला शिवसेनेने मनावर घेतला असं बोललं जात आहे. या प्रकरणाला जास्त महत्त्व देऊ नये असं पवारांनी म्हटलं होतं. कंगना शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहे. दरम्यान बीएमसीने कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर केलेली कारवाई सुडबुद्धीतून केल्याचा आरोप देखील शिवसेनेवर करण्यात आला. बीएमसीने बुधवारी केलेल्या कारवाईनंतर देखील काही ट्वीट कंगनाने केले होते.
आज कंगनाने पुन्हा एकदा तिने शिवसेनेवर ट्विटरवरून टीका करण्यास सुरूवात केली आहे. कंगनाने आताच्या शिवसेनेची तुलना थेट बाळासाहेबांच्या शिवसेनेशी केली आहे. कंगनाने ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘ज्या विचारधारेच्या आधारे श्री बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची निर्मिती केली होती, आज त्यांनी सत्तेसाठी ती विचारधारा विकून शिवसेनेवरून सोनिया सेना बनले आहेत. ज्या गुंडांनी माझ्या मागे माझे घर तोडले त्यांना सिव्हिक बॉडी म्हणून नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करू नका’.
14 Comments