महाराष्ट्र 14 न्यूज : राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जाहीर केलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजने’अंतर्गत जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एक लाख ३७ हजार ४५९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, या शेतकऱ्यांना सुमारे १००९ कोटी ६० लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे.
करोनाचा प्रार्दुभाव आणि अतिवृष्टीमुळे उभ्या राहिलेल्या संकटाच्या काळातही या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात जिल्हा प्रशासन गुंतले असल्याने कर्जमाफीचा लाभ देण्याची कामे प्रलंबित होती. आता ही कामे पुन्हा सुरू झाली आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे याबाबत म्हणाल्या, ‘या योजनेसाठी आतापर्यंत अपलोड केलेली कर्ज खाती एक लाख ५२ हजार ७९३ आहेत. या खात्यांपैकी आधार प्रमाणिकरण झालेली खाती एक लाख ३८ हजार ७६८ आहेत.
त्यापैकी एक लाख ३७ हजार ४५९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर सुमारे १००९ कोटी ६० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. ‘कर्जमाफी योजनेच्या लाभाबाबत दोन हजार ८८० शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींचे निवारण जिल्हास्तरीय समिती आणि तहसीलदार यांच्याकडून करण्यात येत आहे. या तक्रारींपैकी ६६० तक्रारींचे जिल्हास्तरीय समितीकडून, तर दोन हजार ४१ शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तहसीलदार कार्यालय स्तरावर निवारण झाले आहे. जिल्हास्तरीय समितीकडे २३ आणि तहसीलदारांकडे १५६ तक्रारी या प्रलंबित आहेत,’ असे डॉ. कटारे यांनी स्पष्ट केले.
156 Comments