महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक : ३० जानेवारी २०२१) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्यिकांनी महात्मा गांधी यांच्या ७३व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शनिवार, दिनांक ३० जानेवारी २०२१ रोजी पिंपळे गुरव येथे मौनव्रत पाळले.
दिलासा संस्था, शब्दधन काव्यमंच आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद या संस्थांनी या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. ह.भ.प. किसनमहाराज चौधरी, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, समीक्षक प्रदीप गांधलीकर, ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के, प्रकाशक नितीन हिरवे, दिलासा संस्था आणि शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कंक, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची गाथा यांचे पूजन करून महात्मा गांधी यांच्या आवडत्या “वैष्णव जन तो येणे कहिए…” या संतकवी नरसी मेहता यांच्या पदाचे संगीता झिंजुरके आणि शरद शेजवळ यांनी गायन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी किसनमहाराज चौधरी यांनी, “समाजाचे हित साधते ते साहित्य होय!” असे विचार मांडले. पुरुषोत्तम सदाफुले यांनी, “पंचवीस लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांचे स्मारक व्हावे!” अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रदीप गांधलीकर यांनी अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक असलेले निकष आणि मराठी भाषेची प्राचीनता याविषयी माहिती दिली. शोभा जोशी यांनी, “विद्यार्थ्यांना महात्मा गांधीजी समजले पाहिजेत यासाठी प्रयत्न व्हावेत!” असे मत मांडले. सुरेश कंक यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी डॉ. पी.एस. आगरवाल, वर्षा बालगोपाल, निशिकांत गुमास्ते, आण्णा जोगदंड, रामचंद्र प्रधान, शामराव सरकाळे, भाऊसाहेब गायकवाड, विजया नागटिळक, रघुनाथ पाटील, आय.के. शेख, सुभाष शहा, सुनील सुंदर, मधुश्री ओव्हाळ, सुहास घुमरे, अनिल दीक्षित, फुलवती जगताप या साहित्यिकांसह उपस्थित सर्वांनी एक तासाचे मौनव्रत पाळून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचा समारोप “रघुपती राघव राजाराम” या भजनाच्या सामूहिक गायनाने करण्यात आला. प्रथमेश जगदाळे, रामचंद्र प्रधान, जयश्री गुमास्ते, अरुण परदेशी, प्रकाश घोरपडे, शामराव साळुंखे, मुरलीधर दळवी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सुभाष चव्हाण यांनी आभार मानले.
103 Comments