महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ ऑगस्ट) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्राकडून देशाला आज अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे . राज्यात आज ( बुधवारी ) सकाळी ११ वाजता राज्यात समूह राष्ट्रगीत गायन होणार आहे . राज्यातील प्रत्येक नागरिकाने ‘ सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात सहभागी व्हावे , असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वराज्य महोत्सवांतर्गत बुधवारी सकाळी ११:०० ते ११:०१ दरम्यान ( एक मिनीट ) सामूहिक राष्ट्रगीत गायन होणार आहे . विद्यार्थी व शिक्षकांसाठी तर ते बंधनकारक आहेच , मात्र सर्व ठिकाणच्या नागरिकांनीही यात भाग घेणे अपेक्षित आहे .
दरम्यान , राज्यातील अबाल – वृद्धांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवा विक्रम स्थापित करावा , असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे . हा उपक्रम राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी , प्रशासनाने याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी , असा आदेशही त्यांनी दिला .
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत वेगवेगळे अभिनव उपक्रम संपन्न होत आहेत. राज्यातही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू असून, या महोत्सवाअंतर्गतच, ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’ ही अभिनव संकल्पना पुढे आलेली आहे. राज्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.
सामूहिक राष्ट्रगीत गायनासंदर्भात राज्य शासनाने सविस्तर शासन निर्णय जारी केला आहे. देशभक्ती, देशप्रेम आणि आपली उज्वल परंपरा जपण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आहोत. नागरिकांच्या मनात आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्रगीत याविषयी पवित्र भावना आहेच, त्याच पवित्र भावनेला सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून जगाच्या समोर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हती सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी दिली आहे. यामुळे उद्या प्रत्येक नागरिकाने असेल तिथेच थांबून सामूहिक राष्ट्रगीत गान करायचे आहे.