महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहर एकीकडे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करतंय असे असतानाच शहरातील वाकड , पिंपळे निलख , विशाल नगर येथे कोट्यवधी रुपये खर्च करून नागरिकांनी सदनिका विकत घेतल्या आहेत .पण कधी पाण्याचा प्रश्न तर कधी विजेचा ही गोष्ट आता नित्याचीच झाली आहे, असे येथील नागरीक सांगतात. या विजेच्या होणाऱ्या लपंडावास वाचा फोडण्यासाठी स्थानिक नगरसेवक तुषार कामठे आणि आरती चौधे यांनी पिंपळे निलख येथे ‘जनता दरबार’ घेतला.
या भागातील सोसायट्यांमध्ये पुरेसा विद्युत पुरवठाच होत नाही . त्याचा परिणाम थेट दैनंदिन जीवनावर होत आहे . आठवड्यातील पाच दिवसदेखील अखंड वीज पुरवठा होत नसल्याने मुलांचा ” ऑनलाइन अभ्यासाचे बारा वाजले आहेत, तर दुसरीकडे ” वर्क फ्रॉम होम ‘ करणारा नोकरदारवर्ग वैतागला आहे . या सदनिकाधारकांना पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा कधी होणार ? हा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. यावर महावितरणकडून ना ठोस कार्यवाही , ना उपाययोजना निव्वळ आश्वासने मिळत आहेत , अशा तक्रारी नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्यांसमोर मांडल्या .
दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे बहुतांश नागरिक अंधारात असतात . तरीही वाढीव बिल येत आहेत , याबाबत नागरिकांनी अक्षरशः तक्रारींचा पाऊस पडला. अनेक समस्यांचे उत्तरच न सापडल्याने अधिकाऱ्यांनी महिनाभराचा कालावधी मागितला आहे, परंतु येत्या महिन्याभरात या तक्रारींचे निवारण न झाल्यास महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा सोसायटीधारकांनी दिला आहे . यावेळी महापौर उषा ढोरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर, साहाय्यक अभियंता रत्नदीप काळे तसेच महावितरण समितीचे सदस्य आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
1 Comment