महाराष्ट्र 14 न्यून : कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे मार्च महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन करुनही राज्यातला कोरोनाचा हाहाकार काही थांबला नाही. रोज कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत आहेत. अशात सगळी शहरं आता अनलॉक होण्याच्या मार्गावर आहे. पण संपूर्ण लॉकडाऊन कधी हटवण्यात येणार हा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. पण राज्यात कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटवण्यात येणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत लॉकडाऊन उठवण्याची काही घाई नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. उलट जिथे लॉकडाऊन उठवण्याची घाई करण्यात आली तिथे पुन्हा लॉकडाऊन केलं पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले की, कोरोनाच्या संसर्गाबद्दल नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आहे. खरंतर कोरोनाची लागण कोणालाही होऊ शकते. त्यामुळे अति आत्मविश्वास ठेवणं योग्य नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात कोरोनाची पहिली लाट आली आहे पण आता दुसरी लाट येऊ द्यायची नाही. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन उघडण्याऐवजी आपण मिशन बिगिन अंतर्गत टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करत आहोत, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रोज कोरोनाचे धक्कादायक आकडे समोर येत असताना शनिवारीही राज्यात रुग्णांचा मोठा आकडा समोर आला आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 12614 नवीन रुग्ण समोर आले आहेत. गेल्या 24 तासात राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 322 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात संक्रमित लोकांची एकूण संख्या 584754 वर पोहोचली आहे. यापैकी 156409 सक्रिय रुग्ण असून राज्यात 408286 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
3 Comments