महाराष्ट्र 14 न्यूज : “श्रीअष्टविनायक दर्शन आणि त्यांची महती”
यातील चौथा गणपती म्हणजे रायगड जिल्ह्यातील महड गावचा … इच्छापूर्ती गणेश वरदविनायक. पाहू त्याची महती..!
चौथा_गणपती –
श्री_वरदविनायक (महड)
वरद विनायक याचा अर्थच सार्या इच्छांची पूर्ती करणारा आणि वर देणारा विनायक.
पुणे-मुंबई महामार्गापासून तीन किमी दूर खोपोली जवळ आणि पुण्याहून ८० किमी दूर रायगड जिल्ह्यात महड हे असेच एक सुंदर आणि टुमदार गांव मुंबईच्या जवळ आहे. या गावांत वरदविनायकाचे मंदिर आहे. पूर्वीच्या काळी या भागाला भद्रक असे संबोधले जात असे.
असे म्हणतात १६९० मध्ये श्री धोंडू पौडकर यांना मूर्ती तळ्यात सापडली होती. मात्र त्यावर १७२५ सालात कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी वरद विनायकाचे मंदिर बांधले. ह्या मूर्तीची अवस्था एकदम वाईट होती, म्हणून मंदिराच्या ट्रस्टींनी त्याजागी नवीन मूर्तीची स्थापना केली. काही लोकांनी यावर हरकत घेतली आणि कोर्टात केस दाखल केली. म्हणून आता इथे आपल्याला दोन मुर्त्या दिसतात, एक गाभाऱ्याच्या बाहेर आणि एक गाभाऱ्याच्या आंत. एक मूर्ती आहे जी शेंदुराने माखलेली असून तिची सोंड डावीकडे आहे आणि दुसरी आहे ती शुभ्र संगमरवरी असून तिची सोंड उजवीकडे आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या दिसतात आणि मग गणपतीच्या दोन मुर्त्या. ह्या मुर्त्या पूर्वाभिमुख आहेत. या देवळात एक नंदादीप अखंड तेवत आहे. असे म्हणतात की हा नंदादीप १८९२ पासून अखंड जळतो आहे. मंदिराच्या चारही बाजूला ४ हत्तींचे पुतळे आहेत. उत्तरेकडे गोमुख असून ह्या गोमुखातून तीर्थाचा प्रवाह सतत वाहतो आहे. पश्चिमेकडे पवित्र कुंड आहे. मंदिराचा हॉल ८० फुट लांब आणि ८० फुट रुंद असून शिखराची उंची २५ फुट असून ते सोनेरी आहे. शिखरावर नागाची नक्षी आहे. अष्टविनायकांमधील हे एकच असे मंदिर आहे जिथे भक्त मूर्तीच्या जवळ जाऊन स्वतः नैवेद्य दाखवू शकतात.
आख्यायिकेनुसार कौन्डीन्यपूरचा सम्राट भीम आणि त्याची राणी यांना मूल नव्हते. ऋषी विश्वामित्र हे जंगलात तपस्या करीत होते. त्यांना भेटायला ते दोघे गेले. तेव्हा विश्वामित्र यांनी त्यांना एकाक्षर गणेश मंत्र त्यांना दिला. त्या मंत्राच्या जपामुळे त्यांना रुक्मंद नावाचा सुपुत्र झाला. राजकुमार रुक्मंद लवकरच लहानाचा मोठा झाला.
राजकुमार एकदा शिकारीला जंगलात गेला असता ऋषी वाचक्नवी यांच्या आश्रमात राहिला. तेव्हा ऋषींची पत्नी मुकुंदा राजकुमार रुक्मंद याच्या प्रेमात पडली. पण राजकुमाराने तिचे प्रेम स्वीकारण्यास नकार दिला आणि तो आश्रम सोडून निघून गेला. मुकुंदा राजकुमारासाठी झुरत असलेली पाहून इंद्राने रुक्मंद याचा वेश धारण केला आणि तो मुकुंदाकडे गेला. त्यातून मुकुंदाला दिवस गेले आणि तिने ग्रीत्सम्द नावाच्या मुलाला जन्म दिला. ग्रीत्सम्द याला जेंव्हा आपल्या जन्माविषयी समजले तेंव्हा तो आपल्या आईला शाप देतो आणि पुष्पक अरण्यात जाऊन तपस्या करू लागतो. त्याच्या तपाने गणपती प्रसन्न होतो आणि त्याला सांगतो की त्याला एक अतिशय धाडसी मुलगा होईल ज्याला केवळ भगवान शंकर हरवू शकतील.
ग्रीत्सम्द याने गणपतीला तेथेच कायमचा निवास करण्यास सांगितले आणि ब्रम्हज्ञान देण्याची विनंती केली. आज त्या जंगलाला भद्रका असे म्हणतात. ग्रीत्सम्द याने त्या जागी गणपतीचे मंदिर बांधले आणि तिथे स्थापना केलेल्या गणपतीला वरदविनायक म्हणतात. असे मानले जाते की माघी चतुर्थीला जर इथे प्रसाद म्हणून मिळालेला नारळ खाल्ल्याने पुत्र प्राप्ती होते. त्यामुळे माघी उत्सवात या देवळात भक्त अतिशय गर्दी करतात.
हा गणपती नवसाला पावणारा आहे असे मानतात. इथे येणारे भाविक दुपारी १२ पर्यंत स्वहस्ते गणपतीची पूजा करू शकतात. दुपारी १२ ते २ या वेळात प्रसाद वाटला जातो.
गणेश चतुर्थी आणि माघ प्रतिपदा ते पंचमी (गणेश जयंती) या दिवसात उत्सव साजरा केला जातो. गणेश जयंतीच्या उत्सवात पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी होते. शिवाय अंगारकी आणि संकष्टी चतुर्थी यादिवशी विशेष पूजा केल्या जाते.
क्रमश:.. उद्या भेटू… थेऊरच्या चिंतामणीला..!
44 Comments