महाराष्ट्र 14 न्यूज : शहरात पावसाला सुरुवात होताच रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. आधीच पावसामुळे वाहतूक संथ गतीने चालत आहे. त्यातच खड्डयांची भर पडली आहे. त्यामुळे वाहन चालकांना खड्डे चुकवत मार्ग काढावा लागत आहे. पिंपळे गुरव मधील काटेपुरम येथे मुख्य बाजारपेठेतील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. येथील बाजारपेठेत सतत वर्दळ सुरु असते. मात्र येथील खड्डयांमुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा खड्डा चुकविताना अपघात होण्याची दाट शक्यता असते.
यामुळे आता गंभीर अपघातानंतरच रस्त्याची दुरुस्ती होणार का अशी नागरिकांकडून तसेच बाजारपेठेतील दुकादारांकडून विचारणा होत आहे. अशा खड्यांमध्ये गाडी आदळल्याने वाहन चालविणाऱ्या नागरिकांना पाठीचे, मणक्याचे दुखणे सुरू झाले आहेत. दरवर्षी परिसरात अनेक ठिकाणी ‘खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे’ अशी परिस्थिती निर्माण होते. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सततच्या पावसामुळे परिसरात अनेक ठिकाणी खड्डयांना तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यात साठलेले घाण पाणी जाणाऱ्यायेणाऱ्याच्या अंगावर उडते आणि त्यामुळे नागरिकांमध्ये निष्कारण वादविवाद होतात.
रात्रीच्या वेळी पथदिवे सुरू नसलेल्या ठिकाणी खड्डा न दिसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याच्या विकास कामांचा शुभारंभ झाला आहे. मात्र त्यामुळे रस्त्यांवर खडी पसरली आहे. त्यामुळे रस्त्यांवरून गाडी घासरण्याची भीती आहे. आणि अशातच स्पीडब्रेकर आणि तुटकेल्या स्पीडब्रेकरमुळे रस्त्याच्या आजूबाजूला पाणी साचत आहे. पिंपळे गुरव येथील मुख्य बाजारपेठतील रस्त्यांवर खड्डे वाढले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून अपघात होण्याची शक्यता आहे. येथील खड्डे आणि असुरक्षितता यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. संपुर्ण रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसामुळे काटेपुरम चौक ते विनायक नगर दरम्यान खड्डे होऊन पावसामुळे त्या खड्यात पाणी साचून तळ्याचे स्वरूप झालेले चित्र पहावयास मिळत आहे. तरी स्थानिक लोकप्रतिनिधीनी आणि महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी माफक अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
114 Comments