महाराष्ट्र 14 न्यूज,( दि.२९ मार्च ) : राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढली तर आगामी काळात संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात शासनानं नियोजन करावं, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता राज्य सरकारने रविवारपासून (28 मार्च) संपूर्ण राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे.
सरकारच्या या आदेशानुसार राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत रोज जमावबंदीचा आदेश लागू असेल. मात्र, पुण्यातील व्यापाऱ्यांनी दुकानं बंद करण्यासाठी 1 तासांचा वेळ वाढवून मिळावा, अशी मागणी केली आहे. पुणे व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी याविषयी माहिती दिली.
व्यापारी असोसिएशनची नक्की मागणी काय?
पुणे व्यापारी असोसिएशनने 8 ऐवजी 9 वाजता दुकाने बंद करायला परवानगी द्या, अशी मागणी केली आहे. दुकानाचे शटर बंद करून आवराआवर करण्यात 40 ते 50 मिनिटं लागतील, असं कारण व्यापाऱ्यांनी दिलं आहे. यामुळे दुकानं बंद करण्याची वेळ 9 पर्यंत वाढवावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडं केली आहे.
प्रशासनाकडे पत्राद्वारे मागणी
पुणे व्यापारी असोसिएशनचे 40 हजार सदस्य आहेत. असोसिएशनने यासंदर्भात प्रशासनाला पत्र लिहून ही मागणी केली आहे. रात्री 8 वाजता लाईट ऑफ, शटर खाली अशी उद्घोषणा पोलीस करत आहेत. यामुळं व्यापाऱ्यांमध्ये भीती ,संभ्रम आहे. एकूणच आता कुठं व्यापार पूर्व पदावर येतोय अशात कडक निर्बंध लादले तर अधिक नुकसान होईल, असं व्यापाऱ्यांना वाटत आहे.
लॉकडाऊन नकोच अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे. मात्र, असं असलं तरी आम्ही प्रशासनाला सहकार्य करत असून प्रशासनाने देखील आम्हाला सहकार्य करावे, अशी मागणी व्यापारी असोसिएशनची असल्याची माहिती सूर्यंकांत पाठक यांनी दिली. जमावबंदीचा पहिला दिवस असल्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांत या आदेशाचे पालन केले गेले. राज्यात सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होत आहे. रविवारी महाराष्ट्रात 40 हजार 414 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. नागरिकांकडून कोरोना नियमांचं पालनं होत नसल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना लॉकडाऊनची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
72 Comments