महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यात मराठा क्रांती मोर्चानं बुधवारी पीडित परीक्षार्थ्यांना घेऊन महावितरण कंपनीविरोधात आक्रमक आंदोलन केलं. रास्तापेठेतील वीज महावितरणच्या मुख्य कार्यालयात जाऊन मराठा मोर्चानं राडा केला. महावितरण भरती प्रक्रियेतील अर्ज पडताळणी बंद पाडली. भरती प्रक्रियेतून एसईबीसी (SEBC) कोट्यातील मराठा परिक्षार्थींना वगळल्यानं हे आंदोलन करण्यात आलं.
एसईबीसी (SEBC) आरक्षण कोट्यातून निवड झालेल्या पाचशे उमेदवारांना तात्काळ नियुक्त पत्र द्यावे, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
दरम्यान, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने 495 उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे. त्यात महावितरण कंपनीच्या 2000 पदांसाठी डाक्युमेंट पडताडणी सुरू होती. पण एसईबीसी उमेदवारांना वगळल्यानं मराठा आंदोलकांनी ही प्रक्रिया बंद पाडली. महावितरण उपकेंद्र सहाय्यक पदासाठी दिनांक 9.7.2019 रोजी 05/2019 जाहिरात देण्यात आलेली होती. ऑनलाइन फॉर्मची अंतिम तारीख 26.7.2019 होती. ऑनलाइन क्षमता चाचणी 25. 8.2019 रोजी घेण्यात आली. 25 मार्च 2020 नंतर कोरोनामुळे लॉकडाऊन झालं.
उमेदवारांची निवड यादी 28.6.2020 जाहीर करण्यात आली. ही यादी प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व नियुक्त्या या त्याच दरम्यान देणे अभिप्रेत होतं. मात्र एसईबीसी (SEBC) कोट्यातील उमेदवारांना वगळून अर्ज पडताळणी 2 डिसेंबर 2020 रोजी शटर बंद करून पुणे येथील रास्ता पेठेतील महावितरणच्या कार्यालयात सुरू होती. मराठा क्रांती मोर्चानं थेट कार्यालयात जाऊन आक्रमक भूमिका घेत अर्ज पडताळणी प्रक्रिया बंद पाडली.
मराठा समाजातील हजारो युवकांना दिलासा…
दुसरीकडे, मराठा समाजाला अजून आरक्षण मिळाल नाहीय तरीही महावितरणमध्ये सुरू असणारी भरती त्वरित थांबवावी त्याचबरोबर वीज बिल माफ करावीत, या मागणीसाठी बुधवारी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरमध्ये आंदोलन केलं. महावितरण कार्यालयाच्या बाहेर घोषणाबाजी केल्यानंतर निवेदन देण्यासाठी अधिकार्यांची भेट घ्यायला आंदोलक कार्यालयात गेले.
त्यावेळी अधिकाऱ्यांसोबत आंदोलनकर्त्यांची जोरदार बाचाबाची झाली. पण याच वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असल्याने अनुचित घटना घडली नाही. मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी ऊर्जामंत्री यांच्या कार्यालयाशी संपर्क केला. त्यानंतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कार्यालयातून ही भरती थांबवली आहे. त्यानंतर मराठा समाजाचे कार्यकर्ते शांत झाले. पण या आंदोलनामुळे महावितरणमधली भरती थांबल्याने मराठा समाजातील हजारो युवकांना दिलासा मिळाला आहे.
20 Comments