महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने विविध धार्मिक उत्सव कशा प्रकारे साजरे करावेत किंवा करू नयेत याबाबतच्या सूचना व आदेश केलेले आहेत. प्रत्यक्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाला त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केला आहे.
प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात शितोळे म्हणतात, महत्त्वाचा उत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा होत असतो. कोरोना कालावधीतील हा उत्सव चांगले पद्धतीने करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने ठोस पावले व उपायोजना केल्या पाहिजे होत्या. परंतु पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत त्या दिसत नाहीत. याउलट शेजारीच असलेल्या पुणे महानगरपालिकेमध्ये गणपती बाप्पाचे प्रतिष्ठापना व विसर्जन गौरी गणपती यांचे नियोजन केल्याचे दिसून येते. दोन्ही महानगरपालिकेत एकाच पक्षाची सत्ता असूनही केवळ आपल्या शहरात मलई खाण्याची कामेच मनापासून केली जातात, हेच दिसून येत आहे. पुण्य कमावण्याची असूनसुद्धा यांच्यामध्ये ती मानसिकता नाही हे आपल्या शहराचे दुर्भाग्य आहे.
पुणे महानगरपालिकेने प्रत्येक घरात पोटॅशियम कार्बोनेट ची पावडर देत असून २० लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो पोटॅशियम कार्बोनेट टाकल्यास सर्व प्रकारच्या मूर्तींचे विघटन होते व दोन दिवसात त्याचा पुन्हा उपयोग होऊ शकतो. यासाठी घरटी विसर्जन व्हावे म्हणून व नदीघाटावर गणपती विसर्जन होणार नाही याची खबरदारी म्हणून नियोजन केले आहे .तसेच गल्ली बोळांमध्ये फिरते पाण्याचे हौद येणार असून याद्वारे श्री गणपती मूर्तींचे संकलन ,तसेच शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जनासाठीचे नियोजन केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अशा प्रकारच्या सुज्ञ कल्पनांची वनवा दिसते. सत्ताधारी पक्षाचे नागरिकांना अशा प्रकारची सुविधा व सेवा देण्याची अजिबात इच्छा नाही हेच यातून सिद्ध होते, अशी टीका शितोळे यांनी केली आहे.
वास्तविक पाहता, पिंपरी चिंचवड शहरात विविध माहिती फलकांचा वापर करून नियोजन करणे गरजेचे होते. सत्ताधाऱ्यांनी नियुक्त केलेल्या प्रसिद्धीच्या सल्लागाराची नागरिकांपर्यंत उत्सव कसा असावा, विसर्जन कसे असावे , महानगरपालिकेच्या सूचना, महानगरपालिकेने प्रत्येक घरातील गणपती मुर्तीं बाबत विसर्जनाचे केलेले नियोजन, यासाठी सल्लागाराने सोशल मीडियाचा वापर करून प्रसिद्धी करणे आवश्यक होते, ते काहीही झालेले नाही. त्यातच कोरोना कालावधीतला हा उत्सव मुळातच मर्यादित आहे. तरी देखील नागरिकांची गैरव्यवस्था होऊ नये अशी साधी इच्छा सुद्धा प्रशासन व सत्ताधाऱ्यांची नाही हेच दिसून येते. त्यामुळे या प्रमुख उत्सवाचा सुद्धा अवमान होत आहे हे खेदाने म्हणावेसे वाटते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
उलट अशावेळी आयुक्त व सत्ताधारी यांनी सर्वांना एकत्र घेऊन अशा प्रत्येक घरात साजरा होणाऱ्या या उत्सवास कशा प्रकारे सहकार्य करता येईल याचे नियोजन केले पाहिजे होते .परंतु कदाचित फुकटचे पुण्य सुद्धा नको कारण याच्यात कुठलीही मलई दिसत नाही. त्यामुळेच गणपती बाप्पाच्या उत्सवात कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही असे अनेकांना वाटत आहे. शहरातील नागरिकांच्या धार्मिक भावनांचा आदर राखून गणेशोत्सव अतिशय आदराने केला जातो. परंतु अशा काळात त्यावर काही बंधने आहेत हे सर्वांनाच कळते .परंतु महानगरपालिका प्रशासनाने व त्यावर सत्ता गाजवणार यांनी सर्व गोष्टी लक्षात घेऊन चांगले नियोजन केले पाहिजे. ठराविक ठिकाणी नागरिकांनी गणेश मूर्ती एकत्र कराव्यात म्हणजे नागरिकांचे एकत्र येणे आलेच. असले नियोजन काय कामाचे. नद्यांचे घाट बंद करून दुसरीकडे मूर्ती एकाच ठिकाणी द्या म्हणजे नागरिकांना निमंत्रण व संसर्गाला आमंत्रण हीच गत म्हणावे लागेल, असे शितोळे यांनी म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिक नगरी आहे शहराच्या विविध भागात विविध दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन होत असते . अनंत चतुर्दशीपर्यंतचे नियोजन आजही करता येणे शक्य आहे. पण तसे दिसले नाही म्हणूनच शहरातील ढिसाळ नियोजन याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. उद्या शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांच्या विविध घाटांवर बंदी असूनही गणपती विसर्जन झाल्यास व त्यातून कोरोना चा संसर्ग संपूर्ण शहरात वाढल्यास त्यास पूर्णपणे प्रशासन व सत्ताधारी जबाबदार असतील. परंतु ती वेळ येऊ द्यायची नसेल तर एक दिवसात सुद्धा सर्व प्रकारचे नियोजन होऊ शकते. अशा वेळी तातडीने सत्ताधारी प्रमुख ,विरोधी प्रमुख व प्रशासनाने मिळून नियोजन केले पाहिजे, अशी सुचना शितोळे यांनी केली आहे.
22 Comments