महाराष्ट्र 14 न्यूज : १६ जानेवारी २०२१ पासून आज भारतात सर्वात मोठा लसीकरण ड्राइव्ह सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी साडेदहा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लसीकरण मोहिमेला सुरुवात केली. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हॅक्सिन मोहिमेला सुरुवात केली.
यानंतर कोविशिल्ड’ या लसीचे डोस देण्याचा शुभारंभ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे निलख दवाखान्यात नगरसेविका आरतीताई चौधे आणि नगरसेवक संदीपआण्णा कस्पटे यांच्या हस्ते करण्यात आला. या लसीकरण मोहिमेसाठी दवाखान्यात लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. खूप दिवसांची प्रतीक्षेत असणारी लस मिळण्यासाठी थेरगाव विभागात पिंपळे निलख दवाखान्याची निवड झाली असून प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री शेलार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या नियोजनामुळे त्यांना लसीकरण केंद्राचा मान मिळाला आहे.
कोरोनाच्या काळात वैद्यकीय विभागाने व आरोग्य कर्मचाऱ्यांने सतर्कतेचे काम केले आहे. त्यामुळे प्रथम त्यांना ही लस देण्यात आली. लस टप्प्याटप्प्याने दिली जात असून पिंपरी चिंचवड मनपाने याची सर्वत्र सुसज्ज अशी व्यवस्था केली आहे. लस दिल्यानंतर सर्व दक्षता घेण्यात आली असल्याची माहिती थेरगाव विभागाच्या प्रमुख जेष्ठ वैद्यकीय अधिकारी सुनीता इंजिनिअर यांनी दिली.
या कार्यक्रमावेळी बोलताना ‘डॉ. जयश्री शेलार’ म्हणाल्या “कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतीकारक पाऊल आहे, तसेच सर्वात उत्तम लस ही मास्क आहे. लस घेतल्यानंतरसुद्धा मास्क वापरावा लागेल. आतापर्यंत आपण मास्क, हात धुणे आणि सुरक्षीत अंतर या त्रिसूत्रीने कोरोनाचा मुकाबला केला आहे, त्याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन ‘डॉ. जयश्री शेलार’ यांनी आज कोरोना लसीकरणाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात केले.
यावेळी पहिल्या टप्प्यातील प्राधान्य गटातील ४९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. तसेच पुढील डोस केव्हा देण्यात येणार आहे याची माहिती देण्यात आली.परिचारिका अर्चना शिंदे आणि राणी भोई यांनी आरोग्य सेवकांना लस दिली. लस घेतल्यानंतर सर्वांना अर्धा तास निरीक्षण कक्षात ठेवण्यात आले होते. अर्धा तासापर्यंत त्यांना कुठलाही त्रास जाणवला नाही. त्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले. लसीकरणानंतर डॉ. सुनीता इंजिनिअर यांनी लसीकरणाचा अनुभव सुखद असल्याचे सांगितले. लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास जाणवला नाही. ही लस घेण्यात कुठलाही धोका नसून ज्यांनी नोंदणी केली, त्यांनी कुठलीही भीती मनात न बाळगता लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे डॉ. सागर पाटील यांनी लसीकरणानंतर काहीही त्रास नसून कोविडपासून बचाव करण्यासाठी ही लस उपयुक्त असल्याचे सांगितले.
लसीकरणाने आरोग्यसेवकांचा आत्मविश्वास नक्की वाढेल, असे ते म्हणाले. डॉ. आसावरी ढवळे यांनी लसीकरणाचा कुठलाही विपरीत परिणाम नसल्याचे सांगितले. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका. कोरोना वॉरिअर्स म्हणून आम्ही ही घेत आहोत, तसेच ही लस सुरक्षित असून हे लसीकरण फ्रंट लाईन वर्करने स्वत:हून समोर येऊन लसीकरण करायला हवे, असे आवाहन करण्यात आले.
29 Comments