महाराष्ट्र 14 न्यूज : “लोकांकडे उपचारासाठी पैसे नाहीत, त्यांचे जीव जात आहेत, त्यांना वाचवा’ असं म्हणत मुख्यमंत्री सहायता निधीचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले. मदतीसाठी विचारणाऱ्यांना मदत न करु शकल्याची वेदना सांगताना ते ढसाढसा रडले. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी सुरु करण्यासाठी न्यायालयात देखील धाव घेतली आहे.
त्यांनी न्यायालयाकडे याबाबतच्या तांत्रिक त्रुटी दूर करुन गरीबांना मदतीचा मार्ग मोकळा करण्याची विनंती केली आहे. ओमप्रकाश शेटे म्हणाले, “मी मुख्यमंत्री सहायता निधीत प्रमुख राहिलो आहे. ज्या ताटात जेवलो त्याला तडा द्यायचा नाही, पण खूप वाईट वाटतं. कधीकधी तर झोप येत नाही.
जिथं आम्ही मंदिर तयार केलं होतं ते आता पाडण्यात आलं आहे. सामान्य माणसांना जगणं कठीण झालं आहे. खूप वाईट वाटतं. मात्र, मुख्यमंत्री सहायता निधीबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्यामुळे या अधिकाराचा कसा उपयोग करायचा हे त्यांनाच ठरवायचं आहे. मात्र, सध्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.”
1 Comment