महाराष्ट्र 14 न्यूज : अभिनेत्री कंगना राणौतला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देणे हा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच असल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, एखाद्या व्यक्तीने चुकीचे वक्तव्य केले असेल, त्याचे विचार अयोग्य असतील तर आपण त्यावर आक्षेप नोंदवू शकतो. मात्र, त्या व्यक्तीचा जीव आणि मालमत्तेचे संरक्षण करणे, ही राज्य सरकार आणि संवैधानिक पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.
तसे होत नसेल तर आपल्याला ‘बनाना रिपब्लिक’ होण्यास वेळ लागणार नाही. मग आपल्याकडे कायद्याचे राज्य उरणार नाही. त्यामुळे तुम्हाला एखाद्याचे मत पटत नसेल तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा. मात्र, संबंधित व्यक्तीचे रक्षण करणे हे संवैधानिक पदावरील व्यक्तींचे कर्तव्य आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा पुरवण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना राणौतला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरवणे ही बाब धक्कादायक आहे. महाराष्ट्र हा काही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचाच नाही, तर भाजपाचा आणि अवघ्या जनतेचा आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सगळ्याच पक्षांनी निषेध नोंदवायला हवा, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
19 Comments