महाराष्ट्र 14 न्यूज : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकालावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचले आहे. ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही. दोन पक्षांना फायदा झाला, जसे आम्ही आत्मचिंतन केले पाहिजे, तसे ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांची एकही जागा येत नाही, त्यांनीही आत्मचिंतन करावे, असा सल्ला फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता दिला आहे.
विधान परिषदेच्या सहा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन, भाजप 1 आणि अपक्ष 1 असे चित्र आहे. भाजपला या निवडणुकीत जोरदार फटका बसला असून, नागपूर आणि पुणे हे पारंपरिक मतदारसंघ मात्र गमवावे लागले आहेत. यावर फडणवीस आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात एकच जागा जिंकता आल्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी आम्ही बेसावध राहिल्याची कबुली दिली आहे. यामुळेच निकालात बदल दिसला, आम्ही कुठे कमी पडलो त्याचे विश्लेषण करू, पण भाजपची पीछेहाट अजिबात नाही, असे ते म्हणाले.
16 Comments