महाराष्ट्र 14 न्यूज : धावपळीच्या युगात मन:शांती महत्वाची असते. त्यातून समाधान आणि आनंद प्राप्त करण्यासाठी महापालिकेने उभारलेल्या ध्यानकेंद्राचा परिसरातील नागरिकांना ताणतणाव दूर करण्यासाठी उपयोग होईल, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. ३०, कासारवाडी येथील नव्याने विकसित झालेल्या ध्यानकेंद्राचा लोकार्पण कार्यक्रम तसेच नवीन बांधण्यात येणा-या भाजीमंडईचा भूमिपूजनाचा कार्यक्रम महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपमहापौर केशव घोळवे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य राजू बनसोडे, रोहित काटे, माऊली थोरात, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, स्वाती उर्फ माई काटे, ह क्षेत्रीय अधिकारी हराळे, सहाय्यक आरोग्याधिकारी रमेश भोसले, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कासारवाडी येथे बांधण्यात येत असलेल्या भाजी मंडईचे क्षेत्रफळ ११३० चौरस फूट असून त्यामध्ये तीन मजले करण्यात येणार आहेत. पहिल्या मजल्यावर मंडई व पार्किंग, तर दुस-या मजल्यावर बहुउद्देशीय हॉल आणि तिस-या मजल्यावर मेझेनेन फ्लोअर करण्यात येणार आहे. या कामासाठी रक्कम रुपये २ कोटी ४७ लाख इतका खर्च येणार आहे तर कासारवाडी येथील लोकार्पण झालेल्या ध्यानकेंद्राचा हॉल ३२२ चौरस मीटरचा असून याकामासाठी ७४ लाख ६२ हजार इतका खर्च आलेला आहे. याच्या बाजूस योगा इत्यादी उपक्रमासाठी मोकळी जागा आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे यांनी तर सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले आभार सामाजिक कार्यकर्ते संजय शेडगे यांनी मानले.
1 Comment