महाराष्ट्र 14 न्यूज : ग्रामपंचायत मध्ये राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करता येईल,’ अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. मदान यांनी सांगितले की, ‘राज्य निवडणूक आयोगाने 11 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 30 डिसेंबर 2020 पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. राखीव जागांवर निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशपत्र दाखल करताना जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती सादर करावी लागेल.
यासोबतच उमेदवाराला एक हमीपत्रही देणे आवश्यक राहील. “विजयी झाल्याच्या तारेखापासून 12 महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले जाईल,’ असे या हमीपत्रात नमूद करावे लागेल,’ असे मदान यांनी सांगितले आहे. दरम्यान, राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे, तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 (शासकीय सुटी वगळून) या कालावधीत स्वीकारली जातील. त्यांची छाननी 31 डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.
मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले. विधानसभेची मतदारयादी ग्राह्य धरणार विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त मदान यांनी दिली.
14 Comments