महाराष्ट्र 14 न्यूज : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाला आज( ३१ ऑगस्ट २०२०) पूर्णविराम मिळाला. प्रणव मुखर्जी यांच्याप्रमाणे विविध राजकीय पदं भूषवणारा नेता सध्याच्या काळात विरळाच… मुखर्जी यांच्या कार्याची उंची गाठू शकणारे खूप कमी नेते आधुनिक भारतात असतील. प्रणव मुखर्जी यांच्याप्रमाणेच यशाच्या शिखरावर पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा अनेक युवा नेत्यांच्या मनात असेल.
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा मृत्यू दिल्लीतील लष्करी रुग्णालयात सोमवारी ३१ऑगस्ट २०२० ला झाला. मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी मुखर्जी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या शस्त्रक्रियेपूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता ती पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी प्रणव मुखर्जी यांनीच त्याची माहिती ट्वीट करून सर्वांना दिली होती.
आपल्या पन्नास वर्षांच्या लांबलचक राजकीय कारकिर्दीत प्रणव मुखर्जी यांनी प्रचंड यश मिळवलं. त्यांना अपेक्षित असलेलं जवळपास सगळंच त्यांना प्राप्त झालं.
२०१२ ते २०१७ दरम्यान भारताचे राष्ट्रपती राहिलेल्या प्रणव मुखर्जी यांची ओळख फक्त राजकीय नेत्यापर्यंत मर्यादित नव्हती. प्रणव मुखर्जी यांना एक अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही संबोधलं जाऊ शकतं. सुरुवातीच्या काळात ते शिक्षकही होते. इतकंच नव्हे तर त्यांनी काही काळ पत्रकार म्हणूनही काम केलं आहे.
प्रणव मुखर्जी यांनी भारताचे संरक्षण मंत्री म्हणूनही काम पाहिलं. ते परराष्ट्र खात्याचे तसंच अर्थमंत्रीही होते. प्रणव मुखर्जी भारतीय बँकांच्या अनेक समित्यांचे सदस्य राहिले. शिवाय, वर्ल्ड बँकेच्या संचालक मंडळाचेही ते सदस्य होते. मुखर्जी यांनी लोकसभेचं अध्यक्षपदही भूषवलं आहे. तसंच अनेक सरकारी समित्यांचं नेतृत्वही प्रणव मुखर्जी यांनी केलं होतं.
9 Comments