महाराष्ट्र 14 न्यूज : मनात जुना राग ठेवून तिघांनी एकाची अतिशय निर्घृणपणे हत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. दुधाळा येथील माजी सरपंच कैलास खंडुजी गायकवाड (वय 52 ) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. कैलास गायकवाड हे 31 ऑगस्टच्या रात्री दुचाकी क्रमांक एम एच 37 क्यू 8056 ने शिरपूरवरून दुधाळा येथे जात होते. त्याचवेळी मालेगांव – रिसोड महामार्गावरील दुधाळा फाट्यानजीक असलेल्या हॉटेलजवळ त्यांची तिघांनी धारदार शस्त्राने हत्या केली आणि त्यांचा मृतदेह हॉटेल पुढील नाल्यामध्ये टाकून दिला.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,सहाय्यक पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.पवनकुमार बनसोड यांनी वेगाने तपास सुरू केला आणि घटना उघडकीस आल्यानंतर काही तासातच तीन आरोपींना बेड्या ठोकल्या. हत्येअगोदर कैलास गायकवाड यांनी शिरपूर येथे सायंकाळी भाजीपाला आणि दूध घेतले होते. त्यांनंतर ते आपल्या गांवी दुधाळा येथे जात असताना कट रचून पंढरी देवबा गायकवाड,शंकर उर्फ सुनील भगवान साखरे, हरिभाऊ आनंदा गायकवाड या तिघांनी एका हॉटेल जवळ त्यांना बोलवलं.
मनात राग असलेल्या या तिघांनी अतिशय निर्दयीपणे धारदार शस्त्र आणि दगडाने ठेचून कैलास गायकवाड यांना ठार मारले. याप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील 2 आरोपी हे मृतकाच्या नात्यातीलच असल्याचं समजते. दरम्यान, धारदार शस्त्रांनी करण्यात आलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
11 Comments