महाराष्ट्र 14 न्यूज : देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. या कोरोनाच्या स्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाची स्थिती या विषयावर त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळेत रोखणे गरजेचं आहे. कोरोना संबंधीच्या नियमांचं पालन करणे गरजेचं आहे. गेल्या वर्षभरातील कोरोनाविरोधातील लढाईचं यश बेजबाबदारीत बदललं गेलं नाही पाहिजे. टेस्टिंग आणि ट्रेसिंग वेळेत होणे गरजेचं आहे. अनेक राज्यांमध्ये रॅपिड टेस्टवर जोर दिला जात आहे. मात्र आरटीपीसीआर टेस्ट 80 टक्क्यांच्यावर ठेवायला हव्यात, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
अनेक राज्यांमध्ये लसी वापराविना पडून
यावेळी टियर-2 आणि टियर-3 शहरांत देखील कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. याआधी या शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव जास्त झाला नव्हता. मात्र जर कोरोना ग्रामीण भागात पसरला तर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसेल. छोट्या शहरांमध्ये कोरोना चाचण्या वाढवाव्या लागतील. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ आदी राज्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचं आहे. अनेक राज्यांमध्ये लसी वापराविना पडून आहेत, याबाबत नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली. कोरोना लस वाया जाण्याची समस्या गंभीर आहे. ती सुधारायला हवी. तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये कोरोना लस वाया जाण्याचं प्रमाण 10 टक्के आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये हे प्रमाण जवळपास तेवढंच आहे, असं मोदींनी म्हटलं.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्णायक पावलं उचलावी लागतील
कोरोनाच्या लढाईला एक वर्षाहून अधिकचा काळ झाला आहे. भारतीय नागरिकांनी कोरोनाचा जसा सामना केला, ते एक उदाहरण बनलं आहे, त्याची प्रशंसाही झाली. आज देशात 96 टक्के लोक कोरोनामुक्त झाले आहेत. काही राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील 70 जिल्ह्यांत ही वाढ 150 टक्क्यांपर्यंत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला वेळीच रोखलं पाहिजे. यासाठी आपल्याला निर्णायक पावलं उचलावी लागतील, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
1 Comment