महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या पिशोर ग्रामपंचायतीमध्ये एक वेगळेच रंजक चित्र पाहायला मिळत आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याच गावांमध्ये त्यांच्या पत्नीने स्वतःचं एक पॅनल उभं केलं आहे. हर्षवर्धन जाधव यांना सुरुवातीला उमेदवाराची शोधाशोध करावी लागल्याने ग्रामपंचायतीच्या राजकारणातून हर्षवर्धन जाधव बाद होणार का, अशी चर्चा होती. मात्र त्यांच्या मुलाने ऐनवेळी एन्ट्री घेत रंगत वाढवली आहे.
औरंगाबादमधील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या राजकीय संन्यासानंतर त्यांचा नवा वारसदार कोण, याकडे सर्वांचे डोळे लागले होते. आधी जाधव यांच्या विभक्त पत्नी संजना जाधव यांच्याकडे समर्थकांच्या नजरा लागल्या होत्या. परंतु त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयानंतर चित्र पालटलं. आता त्यांचे पुत्र आदित्य जाधव यांनीच थेट रिंगणात उडी घेतली आहे. हर्षवर्धन जाधव यांचा मुलगा आदित्य जाधवने कन्नडमधील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली.
अकरावीत शिकणाऱ्या आदित्य जाधवने आईविरोधात रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे काँग्रेस नेते रायभान जाधव यांची तिसरी पिढी सक्रिय राजकारणात उतरताना दिसत आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुका लढवणार असल्याची घोषणाही त्याने पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे आदित्यच्या पाठीशी वडील संपूर्ण ताकद लावणार असल्याचं निश्चित झालं आहे.
हर्षवर्धन जाधव, संजना जाधव आणि रावसाहेब दानवे यांचे नातेसंबंध एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेले आहे. हर्षवर्धन जाधव हे रावसाहेब दानवे यांचे जावई, तर संजना जाधव यांचे पती. हर्षवर्धन जाधव यांनी अनेक वेळा रावसाहेब दानवे यांच्यावर बेछूट आरोप केलेले आहेत. त्यामुळे सासरे-जावई यांच्यातील वाद सर्वदूर पोहोचला आहे.पिशोर ग्रामपंचायत ही औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. यात सहा प्रभाग असून सतरा सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे. महत्त्वाचं म्हणजे या ग्रामपंचायतीवर ज्यांचं वर्चस्व असेल, त्यांचीच सत्ता वर्षभर तालुक्यावरही असते. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून हर्षवर्धन जाधव यांनी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवली होती.
21 Comments