महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश शिवाजीराव गर्जे सरचिटणीस यांनी कळविले आहे, की राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार राज्य मंत्रीमंडळातील सन्माननीय मंत्री महोदयांनी पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी सोमवार , दि . ३१ ऑगस्ट , २०२० पासून वेळ देण्याचे ठरविण्यात आले आहे . त्यानुसार मा . प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने आठवडयाचे सुधारीत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आता जनता दरबार घेणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जनता दरबार बंद होता. मात्र, आता सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे मंत्री जनता दरबार सुरु करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्र्यांच्या जनता दरबाबाराचं अधिकृत वेळापत्रक ट्विटरवर जाहीर करण्यात आलं आहे. ‘काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ३१ ऑगस्टपासून वेळ देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे’, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.
त्यानुसार सोमवारी दुपारी २ ते ४ यादरम्यान गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, सायंकाळी ४ ते ६ यादरम्यान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची कार्यकर्त्यांना भेट घेता येईल. मंगळवारी सकाळी १० ते १२ यावेळेत अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ, दुपारी २ ते ४ यावेळेत अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, सायंकाळी ४ ते ६ यावेळेत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना भेटता येईल.
बुधवारी सकाळी १० ते १२ यादरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची कार्यकर्त्यांना भेट घेता येईल. तर दुपारी २ ते ४ यादरम्यान मत्स्यविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची कार्यकर्त्यांना भेट घेता येईल. सायंकाळी ४ ते ६ यादरम्यान उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व अदिती तटकरे हे कार्यकर्त्यांना भेटू शकतील. गुरूवारी हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील या मंत्र्यांना भेटता येणार आहे. शुक्रवारी १० ते१२ अनिल देशमुख व ४ ते ६ संजय बनसोडे भेटू शकतील.
1 Comment