महाराष्ट्र 14 न्यूज : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत आणि उपनगर परिसरात बरसत असलेल्या पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तविली आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या चार तासांमध्ये याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या परिसरात शनिवारी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गात ढगफुटीचा इशारा
हवामान खात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटीचा इशारा दिला आहे. त्यामुळे याठिकाणी 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. तसे घडल्यास तौक्ते चक्रीवादळानंतर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नवे संकट ठरेल. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्ग परिसरात आपातकालीन प्रसंगाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (NDRF) पथके तैनात करण्यात आली आहेत.
मुंबई आणि उपनगरात पहाटेपासून मुसळधार पाऊस
मुंबई आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागांमध्य पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता आहे.
सलग दोन ते तीन दिवस पावसाने मोठ्या प्रमाणात ठाणे शहरात देखील हजेरी लावली आहे. तसेच ते येत्या तीन ते चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी सखल भागात पाणी साचायला देखील सुरवात झाली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत तुरळक घट दिसून येत आहे.
78 Comments