महाराष्ट्र 14 न्यूज, (दि२५मे) : ऐन कोरोनाच्या संकटात तौकते चक्रीवादळाने कोकणात मोठय़ा प्रमाणात नुकसान केले. या नुकसानीचा दोन दिवसांत पंचनामा करून मदत जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. वादळग्रस्तांना दिलेल्या या वचनाला जागत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आज केली. तौकते चक्रीवादळामुळे कोकणात हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले.
घरे कोसळली, पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली, त्याचप्रमाणे आंबा बागायतदारांचेही नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी 21 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल व कुणालाही वंचित ठेवणार नाही, असे आश्वस्त केले होते. त्याप्रमाणे त्यांनी आज झालेल्या बैठकीत निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच या वादळात नुकसानभरपाई दिली जाईल, अशी घोषणा केली.
निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना निकषांच्या बाहेर जाऊन राज्य सरकारने मदत केली होती. एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे फळबागांसाठी हेक्टरी 18 हजार रुपये मदत मिळते. पण मागील वेळेस सरकारने हेक्टरी 50 हजार रुपयांपर्यंत मदत केली होती. त्यानुसार आता तौकते चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीच्या प्रस्तावावरही मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होऊन त्यांना मदत केली जाणार आहे.
निसर्ग चक्रीवादळापेक्षा तौकते चक्रिवादळाने अधिक तडाखा दिला. कोकण व किनारपट्टीच्या भागाचे एक हजार कोटींपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नुकसानभरपाईचा आकडा पण वाढणार आहे. निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना 700 कोटींहून अधिक मदत केली होती, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली.
2 Comments