महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.२० मे) : तौत्के चक्रीवादळा मुळे महाराष्ट्र, केरळ, गोवा, गुजरात या राज्यांच्या किनारपट्टीभागाला मोठा फटका बसला. चारही राज्यांत चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले. मात्र, या वादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरात आणि दीव या भागांची हवाई पाहणी केली. तसेच गुजरात राज्यात तातडीच्या मदतकार्यासाठी पंतप्रधानांनी 1000 रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली.
पंतप्रधानांनी गुजरातचाच दौरा केल्याने त्यांच्यावर टीका होत होती. महाराष्ट्रातही यामुद्यावरुन सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली. आता याच मुद्द्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
▶️काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
चक्रीवादळग्रस्त असलेल्या कोकण दौऱ्यावर असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, पंतप्रधानांनी गुजरातचा दौरा केला महाराष्ट्राकडे कमी लक्ष दिले? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधानांनी गुजरातचा दौरा केला याचं कारण म्हणजे लँडफॉल गुजरातमध्ये झालं. गुजरातमध्ये लँडफॉल झाल्याने प्रचंड नुकसान झालं. 45 नागरिकांचा मृत्यू झाला. गावंच्या गावं 100 टक्के उद्वस्त झाली त्यामुळे पंतप्रधानांनी गुजरातचा दौरा केला, तातडीची मदत केली.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, इतर राज्यांनाही मदत करण्यात येईन असं जाहीर केलं आहे. तौत्के चक्रीवादळाचा परिणाम केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दमण, दीवमध्ये आहे एकूण आठ राज्यांत चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे या सर्व राज्यांना केंद्र सरकारच्या वतीने मदत देण्यात येईल.
▶️मुख्यमंत्र्यांनी मोठ्या मदतीची घोषणा करावी
समाधान आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणचा दौरा करत आहेत. सरकार आलं तर आपल्याला काहीतरी मिळेल ही अपेक्षा स्वाभाविक आहे. आम्हीही अपेक्षा करतोय की उद्या मुख्यमंत्री येत आहेत तर त्यांनी भरघोस मदतीची अशी घोषणा करावी. कोकणाने शिवसेनेला भरभरून दिलं आहे तशाच प्रकारे मुख्यमंत्र्यांनीही कोकणाच्या पदरी काहीतरी पाडावं आणि निसर्ग वादळाच्या वेळी जशी निराशा केली तसं आता करू नये असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
2 Comments