महाराष्ट्र 14 न्यूज : अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राजभवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. पण फडणवीस आणि अजितदादांची खेळी फार काळ टिकाव धरु शकली नाही आणि त्यांची ही सत्ता अल्पजीवी ठरली.
फडणवीस-अजितदादांचं सरकार अल्पजिवी का ठरलं?
विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या. बहुमतासाठी 145 आमदारांची गरज होती. दुसरीकडे भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला नाही म्हणत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत संधान साधून होती. तर शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नाही, यावर भाजप नेते ठाम होते आणि आहेत. अशावेळी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नावाला शरद पवार यांनी पसंती दिल्याचं कळत होतं. पण अंतिम निर्णय बाकी होता. तर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु होती. त्याचबरोबर शेवटच्या अडीच वर्षासाठी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याबाबतही खल सुरु होता, असं बोललं जात होतं. त्यामुळे अजित पवार यांना आपलं राजकीय करिअर संपण्याची भीती वाटत होती. अशावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मध्यरात्री BKCतील सोफिटेल हॉटेल मध्ये बैठक झाली आणि शपथविधी उरकण्याचा निर्णय झाला.
भाजपला बहुमतासाठी 40 आमदारांची गरज होती. भाजपचे 105, अन्य छोटे पक्ष आणि अपक्ष असे १५ आणि अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 38 आमदार असा बहुमताचा आकडा पार करता येईल, अशी फडणवीसांना आशा होती. मात्र ती केवळ आशाच राहिली. कारण, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांचं बंड मोडून काढलं आणि पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेससोबत नवी मोट बांधली. त्यामुळे 23 नोव्हेंबरला पहाटे झालेल्या शपथविधीनंतरचं फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद अल्पजीवी ठरलं. त्यांना अवघ्या 80 तासांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
80 Comments