महाराष्ट्र 14 न्यूज : देशातल्या बहुतांश राज्यांत आणि लहान-मोठ्या शहरांत कोविड-19 च्या (Covid 19) रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. या परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर खूप ताण येऊ लागला आहे आणि येत्या काही दिवसांत तो आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोरोना लस घेण्याचं आवाहन लोकांना केलं जात आहे. लस घेतल्यामुळे कोरोनाची संसर्गाची तीव्रता कमी होते. सध्या उपलब्ध असलेल्या लशींचे प्रत्येकी दोन डोस घेणं आवश्यक आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 30 ते 45 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. काही कारणाने लशीचा दुसरा डोस घेता आला नाही तर काय होईल, अशी शंका तुमच्या मनातही आहे का?
देशात आतापर्यंत 10 कोटींहून अधिक नागरिकांनी कोरोना लस (Anti Covid Vaccine) घेतली आहे. मात्र दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तींची संख्या जेमतेम दोन कोटी आहे. लस घेणाऱ्या व्यक्तींच्या संख्येतही कधी वाढ दिसते, तर कधी घट होते. अनेकांना लस घेण्याची भीती वाटत. तर काही जण बेफिकिरीमुळे लस घेत नाहीत. काही लोक तर लशीसाठी नोंदणी केलेली असूनही प्रत्यक्षात लस घ्यायला जातच नाहीत, असंही आढळत आहे. काही लोक विचारतात की, दुसरा डोस नाहीच घेतला तर काय नुकसान होणार आहे?
लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर अनेक व्यक्तींमध्ये काही साइड इफेक्ट्स दिसत आहेत. लोकांच्या मनात लशीबद्दल आधीपासूनच उगाच शंका असतात. त्यात लस घेतल्यानंतर ताप, अशक्तपणासारखी सर्वसामान्य लक्षणं दिसली तरीही लोकांच्या मनातली भीती वाढते. त्यातच लसीकरण वाढवण्याच्या आवश्यकतेचाही एक दबाव यंत्रणेवर आहे. अनेक ठिकाणी लशीच्या तुटवड्याचं वृत्त असल्यामुळेही लोकांच्या मनात शंका उत्पन्न होतात.
देशात जवळपास नऊ कोटी लोक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. कारण दोन डोसमध्ये आवश्यक ते अंतर राखावं लागतं. तेवढे दिवस पूर्ण झाल्याशिवाय दुसरा डोस घेता येत नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लशीचा प्रभाव दुसऱ्या डोसनंतरच दिसू लागेल. कारण दुसरा डोस घेतल्यानंतरच शरीरात कोविड-19 शी लढण्याासाठी पुरेशी क्षमता तयार होईल.
लशीचा दुसरा डोस आणि तोही ठरलेल्या वेळेत घेतला नाही तर लशीचा आवश्यक तो परिणाम दिसणार नाही,असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. सध्या उपलब्ध लशींनुसार दोन डोसमध्ये 30 ते 45 दिवसांचं अंतर असणं आवश्यक असतं. तसंच पहिला डोस ज्या लशीचा घेतला, त्याच लशीचा दुसरा डोस घेणं आवश्यक असतं.
कोविड-19 शी लढण्यासाठी अँटिबॉडीज (Antibodies) तयार करण्याचं काम लस करते. त्यासाठी काही वेळ लागतो. म्हणूनच या लशीचे दोन डोस घ्यावे लागतात. दुसऱ्या डोसनंतरशरीरात रोगप्रतिकार यंत्रणेसोबत कोविडपासून सुरक्षेसाठीचं योग्य तंत्र विकसित व्हायलाही मदत मिळते. दुसऱ्या डोसमुळे लशीचा प्रभाव अधिक वाढतो आणि लशीचा प्रभाव (Efficacy of Vaccine) टिकण्याचा कालावधीही वाढतो. एखादी लस 94 टक्के प्रभावी असेल, तर पहिला डोस घेतल्यानंतर 60 टक्के प्रभावी ठरते. दुसरा डोस घेतल्यानंतर लशीचा पूर्ण प्रभाव दिसून येतो. दुसरा डोस घेतलाच नाही तर पहिल्या लशीने जो काही प्रभाव निर्माण झाला आहे, तोही अल्पकाळ टिकतो. म्हणूनच दुसरा डोस घेणं आवश्यक आहे.
दुसरा डोस घेतला नाही तर नेमकं काय होईल, याबद्दल आता पुरेसं संशोधन झालेलं नाही. कारण सध्या संशोधनाचा प्राधान्यक्रम अधिकाधिक लोकांना सुरक्षितता प्रदान करणं हा आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या संशोधनातून जे स्पष्ट झालं आहे,त्यानुसार पात्र व्यक्तींनी ठरलेल्या अंतराने लशीचे दोन्ही डोस घेण्यातच सर्वांचं हित आहे.
8 Comments