महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी व पणन कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 8 डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपात एपीएमसीच्या सर्व बाजारपेठा सहभागी होणार असून, त्या दिवशी संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
देशभर शेतकरी आंदोलनाचा मुद्दा गाजत असून याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. राज्यातील विविध घटकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला असतानाच आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हेदेखील मैदानात उतरले आहेत. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ अण्णा हजारे एक दिवसाचं उपोषण करणार आहेत.
उद्या होणाऱ्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर अण्णांनी हा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी गर्दी न करता अहिंसात्मक मार्गाने एक दिवसीय आंदोलन करून शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा असं आवाहनही अण्णांनी केले आहे. देशभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अण्णा हजारे यांनी पाठिंबा जाहीर केला असून त्यासंबंधी सविस्तर भूमिका व्यक्त करणारा व्हिडिओ आपल्या यूट्युब चॅनलवर जारी केला आहे.
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे, तसेच व्यापारी व माथाडी कामगारांवर बेकारीचे संकट ओढावणार आहे. त्यामुळे या विरोधात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. देशातील बळीराजाला साथ देण्यासाठी या संपात सहभागी होणार असल्याचे माथाडी कामगार नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी घोषित केले आहे. नवी मुंबई एपीएमसीमधील पाचही मार्केट बंद करतानाच राज्यातील नाशिक , पुणे , नगर , कोल्हापूर मधील बाजार समित्याही उद्याच्या बंदमध्ये सहभागी होणार आहेत
3 Comments