महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६जुलै) : गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. मात्र, आता केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल पुढील 24 तासांच्या आत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी (7 जून) संध्याकाळी साडे पाच वाजता मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं आता सूत्रांकडून कळतंय. या फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर 20 नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे यांच नाव निश्चित मानलं जात आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर राणे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यानंतर राणे आणि नड्डा यांची भेट झाल्यानंतर राणेंच्या केंद्रीय मंत्रिपदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनाही केंद्रीय राज्यमंत्रीपदाची संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे दोन्ही खासदार सध्या दिल्लीत आहे. दरम्यान, राणे आणि पाटील यांना मंत्रिपदाबाबत विचारलं असता त्यांनी मौन बाळगल्याचं पाहायला मिळालं.
राणेंना संधी देण्यामागे रणनिती काय?
नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यामागील मुख्य कारण आगामी मुंबई महापालिका निवडणूक असल्याचं संदीप प्रधान यांनी म्हटलंय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना ताकद देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला जेरीस आणण्याचं काम करत आहेत. त्यामुळे राणे यांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागत असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे अनेक राज्यात आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. काही राज्यात नाराजीचा सूर उमटत आहे. तर काही ठिकाणी भाजपची कामगिरी खराब होण्याची शक्यता व्यक्त होतेय. या पार्श्वभूमीवर आपली प्रतिमा सुधारण्यासाठी, तसंच काही जाती समुहांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांची नाराज दूर करण्याचा प्रयत्न मोदी-शहा यांच्याकडून करण्यात येत असल्याचं मत संदीप प्रधान यांनी व्यक्त केलंय.
कोणाकोणाची वर्णी लागणार
2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले. मात्र, दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी एकदाही मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. परंतु, आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे आणि हिना गावित यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विस्तारात भाजपमधील नेत्यांसह एनडीएच्या मित्र पक्षांनाही स्थान मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
16 Comments