महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३जुलै) : राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेले ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच, असा एल्गार बंडातात्यांनी केला होता. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले.
कोण आहेत बंडातात्या कराडकर? जाणून घ्या त्यांच्याविषयी.
हभप बंडातात्या कराडकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. तसेच ते समाज प्रबोधनकारही आहेत. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला होता. यापूर्वी गोहत्या बंदी कायद्यासाठी त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांना अडवलं होतं. गो हत्या बंदी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा रोखण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
व्यसनमुक्तीची चळवळ
हभप बंडातात्यांनी 1996मध्ये व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना केली होती. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी ही संस्था काम करते. गेल्या 20 वर्षांपासून बंडातात्यांचं हे कार्य सुरू आहे. त्याशिवाय युवकांना इतिहास माहीत व्हावा म्हणून ते गडकोटांवर प्रतापी संस्कार सोहळ्याचे आयोजन करतात. 1997पासून ही सुरुवात झाली, ती आजतागायत सुरू आहे.
वारकरी शिक्षण देणारी पहिली शाळा
व्यसनमुक्ती करतानाच त्यांनी गुरुवर्य भगवान मामा कराडकर शिक्षण संस्थेची स्थापना केली. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये ही संस्था कार्यरत आहे. या शिक्षण संस्थेतून गुरुकूल पद्धतीने शिक्षण दिलं जातं. विशेष म्हणजे राज्यातील पहिली वारकरी शिक्षण देणारी ही शाळा आहे.
दिवाळी साजरी करू नका
महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन काळात मंदिरे खुली न केल्यामुळे बंडातात्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यांनी एक पत्रं लिहून सरकारचा निषेध म्हणून यंदा दिवाळी साजरी करू नका, असं आवाहन केलं होतं. “नरक चतुर्दशीचे अभंगस्नान. आपण भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून करतो भारतातील सर्व मंदिरे खुली आहेत. पण महाराष्ट्रातील मंदिरे आपल्या नरकासुराने गेले आठ महिने कृष्ण रुपी विठ्ठलाला सत्यभामा, रुक्मिणीसह बंदीवासात टाकले असताना आपण कोणता आनंद साजरा करणार आहात? कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका व वणीची सप्तशृंगी बंदिस्त असताना कोणत्या लक्ष्मीचे पूजन करणार आहात? बळीराजा शुगर म्हणून वाहनाने त्याचे राज्य घेतले. येथे असुरांचे राज्य असताना कसली बलिप्रतिपदा करत आहात? या राज्यात दारूची दुकाने, भाजी मंडई, हॉटेल्स, ढाबे, विवाह पार्ट्या, पार्टी मीटिंग सर्रास चालू आहे. मात्र वार्या, भजन सप्ताहांना पूर्ण बंदी आहे. आणि आपण तरीही दिवाळी साजरी करणार आहात का? हिंदूंचा कैवारी नास्तिक व अधर्मी असुरांच्या ताब्यात आहे. तो इच्छा असूनही मंदिरे सुरू करू शकत नाही. एवढ्या करता आपण दिवाळी साजरी न करता यांच्या नावाने शिमगा साजरा करा. आंघोळ करायची असेल तर यांच्या नावाने व गोड खायची असेल तर यांच्या चौदा व्यक्तीच्या नावाने खा. याउपर आपली मर्जी”, असं आवाहन त्यांनी एका निवेदनाद्वारे केलं होतं.
पद्मश्रीची शिफारस नाकारली
2019च्या पद्मश्री पुरस्कारासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी बंडातात्या कराडकरांकडून त्यांची माहिती मागवली. त्यावर आपण कोणतााही पुरस्कार स्वीकारत नाही, असं सांगत त्यांनी स्वत:च्या कार्याची माहिती देण्यास नकार दिला होता.
64 Comments