महाराष्ट्र 14 न्यूज : देशातली सर्वात श्रीमंत असलेली पिंपरी चिंचवड नगरपालिका(स्थापना१९८२) इ.स. १९८६साली महानगरपालिका झाली. त्यानंतर शहराचे काम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे चालू लागले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बोधचिन्हाच्या निर्मितीला १ जुलै रोजी ३४ वर्षे झाली असून, या बोधचिन्हाचा इतिहास रंजक असल्याची माहिती इतिहासाचे अभ्यासक श्रीकांत चौगुले यांनी दिली. हे बोधचिन्ह एका स्पर्धेच्या माध्यमातून प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड नगरपालिकेची स्थापना चार मार्च १९७० रोजी झाली. त्यानंतर ११ ऑक्टोबर १९८२ रोजी महापालिकेत रूपांतर झाले. त्यानंतर ‘कटिबध्दा जनहिताय’हे बोधवाक्य असलेल्या बोधचिन्हाचा वापर १ जुलै १९८७ पासून होऊ लागला.
त्याबाबत इतिहासाचे अभ्यासक श्रीकांत चौगुले म्हणाले, पुर्वी राजे महाराजांच्या काळात राजमुद्रेचा वापर केला जात असे. देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर संस्थाने खालसा झाली. सगळीकडे स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आल्या. त्यांच्या कामकाजात बोधचिन्हाचा वापर होऊ लागला. त्यामुळे बोधचिन्ह तयार करताना त्यामागे स्थानिक पातळीवरील इतिहासाचे प्रतिबिंब आणि स्वतंत्र ओळख असे समीकरण निर्माण झाले.
शहराचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर ५ वर्षांहून अधिक काळ बोधचिन्ह वापरले जात नव्हते. ही बाब तत्कालीन महापौर नाना शितोळे यांना जाणवली. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाने बोधचिन्हाच्या वापरासाठी स्पर्धा जाहीर केली. त्यात १४ जणांनी भाग घेतला. त्यातून गजानन वाळवेकर यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाची निवड करण्यात आली.
या बोधचिन्हामध्ये उद्योगाचे प्रतीक म्हणून चक्र दर्शविण्यात आले आहे. कारखान्याचे चित्र आणि महासाधू मोरया गोसावी यांचे संजीवन समाधी मंदिर आहे. मध्यभागी शिवरायांची भूमी म्हणून छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे छायाचित्र आहे. त्यावर ‘कटिबध्दा जनहिताय’ हे बोधवाक्य आहे. असे चौगुले यांनी सांगितले.
24 Comments