महाराष्ट्र 14 न्यूज : शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हे ओळखून सामान्य जनतेच्या शिक्षणासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ता.४ ऑक्टोबर १९१९ रोजी काले, जि.सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिक्षणप्रसार व समाजप्रबोधन यांसाठी कर्मवीरांनी हयात वेचली. सर्वांना शिक्षणाची समान संधी लाभली पाहिजे या ध्येयाने प्रेरित होऊन जात, गोत, धर्म पंथ इत्यादी सामाजिक भेद नष्ट करून समता, बंधुता व मानवता यांकडे स्वावलंबानाने संस्थेची वाटचाल सुरु आहे. कर्मवीर भाऊराव यांच्यावर श्रद्धा असणारे सेवक व हितचिंतक यांच्या सहकार्याने संस्थेचा विस्तार विकास सातत्याने होत आहे.
रयत शिक्षण संस्थेचं महाराष्ट्रातील जाळं हे फार मोठं आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये रयतचं नाव घेतलं जातं. आता ही शिक्षण संस्था वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव कऱ्हाळे यांनी पुण्यात राजीनामा दिल्यानं राजकीयसह शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर उमटणारे प्रतिसाद व इतर काही प्रतिकूल परिणाम होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाऊले उचलल्याचं बोललं जात आहे. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. यामागे माजी सचिव कऱ्हाळे यांच्या राजीनाम्याचं कारण असल्याचं देखील समजत आहे. पवारांच्या नेतृत्त्वात आज साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेची महत्त्वाची बैठक घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
या बैठकीला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील आणि रयतचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कऱ्हाळे हे मागील तीन वर्षांपासून पुण्यातील रयत शिक्षण संस्थेत कार्यरत होते. त्यांच्या अचानक राजीनाम्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून अनेक उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे साताऱ्यात होणाऱ्या या बैठकीकडे संस्थापातळीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. डॅमेज कंट्रोलसाठी पवार काय रणनीती आखणार यावर उत्सुकता निर्माण झाली आहे.
3 Comments