महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. ३० मार्च ) : राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. तसंच लॉकडाऊन लागणार असल्याचा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे. यामुळे सरकारवर टीका केली जात आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपी यांनी सरकारच्या वतीने स्पष्टीकरण दिलं आहे.
यावेळी टोपे म्हणाले की, राज्यात दिवसेंदिवस नव्याने कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारला याची चिंता आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. वाढणारी रुग्णसंख्या रोखण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते सगळं राज्य सरकार करत आहे. राज्यात संसाधनांची कमी पडू दिली जात नाही. कोरोना संख्येच्या वाढत्या गतीपुढे आपली संसाधनं कमी पडतील अशी मला शंका वाटते आहे.
लॉकडाऊनची कोणालाही हौस नाही. पण आपली संसाधनं जर वाढत्या रुग्णांच्या पुढे कमी पडत असतील तर लॉकडाऊन करावा लागतो,’ अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे. नागरिकांनी कोरोनाचे दिलेले नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येईल. कोरोनासाठी निधीची अडचण नाही. बहुतांश कोरोनाग्रस्त स्वत:ची काळजी घेत नाहीत त्यामुळे दुसऱ्यांना संसर्ग होत आहे. ही काळजी करायला लावणारी बाब आहे.
दरम्यान, राज्यात लॉकडाऊनच्या दृष्टीने तयारीला लागा, अशा सूचना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेनंतर भाजप आणि मनसेनं सरकारवर जोरदार निशाणा साधला. गरीब आणि सर्वसामान्य लोकांना आता लॉकडाऊन परवडणार नाही, असं म्हणत या दोन्ही पक्षांनी लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली.
267 Comments