महाराष्ट्र 14 न्यूज : गौरी विसर्जनानंतर गुरुवारी (दि. २७) पिंपरीतील फुलबाजारात फुलांच्या भावामध्ये चांगलीच घसरण झाली. झेंडू, गुलछडी, शेवंती आदी फुलांचे भाव प्रति किलोमागे निम्म्याने कमी झाले. फुलांची मागणी घटल्याने आणि तुलनेत आवक वाढल्याने फुलांचे दर घसरले.
गणेशोत्सव सुरू झाल्यापासून पिंपरीतील फुलबाजारात सलग पाच दिवस फुलांना चांगली मागणी होती. गौरीपूजनाच्या आदल्या दिवशी मंगळवारी (दि. २५) फुलांच्या भावाने उच्चांक केला होता. साधा झेंडू १०० ते १६० रुपये किलो दराने विकला जात होता. तर, कलकत्ता झेंडूचे दर प्रति किलो १५० ते २०० रुपयांपर्यंत जाऊन पोहचले होते. हे दर निम्म्याने कमी झाल्याचे चित्र आज पाहण्यास मिळाले.
साधा झेंडू आज ५० रुपये किलो दराने विकला गेला. तर, कलकत्ता झेंडू ८० ते १०० रुपये किलो दराने विकण्यात आला. गुलछडी फुलाचे दर प्रति किलो ४०० ते ६०० रुपयांपर्यंत पोहचले होते. हे दर आज २०० ते ४०० रुपये प्रति किलो होते. शेवंतीच्या दरातही चांगलीच घसरण पाहण्यास मिळाली. पांढरी आणि पिवळी शेवंती १६० ते २५० रुपये या दराने दोन दिवसांपूर्वी विकली गेली. तर, आज तिचे दर प्रति किलो १०० ते १५० रुपये इतके होते. गुलाब गड्डी ४० ते ६० रुपये तर, आर्किड गड्डी ४०० ते ६०० रुपये या दराने विकली गेली.
बाजार मंदावला :-
गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर शनिवारपासून (दि. २२) फुलांच्या भावात चांगलीच वाढ झाली होती. गौरी पुजनापर्यंत झेंडू, शेवंती, गुलछडी व अन्य फुलांना चांगली मागणी होती. मात्र, गौरी विसर्जन झाल्यानंतर फुलांचा बाजार मंदावला. फुलांचे दरही निम्म्याने कमी झाले आहेत. सध्या फुलांची आवक वाढली आहे. मात्र, ग्राहक कमी झाले आहेत. त्यामुळे फुलांच्या मागणीतही घट झाली आहे, अशी माहिती फुल विक्रेते गणेश आहेर यांनी दिली.
12 Comments