महाराष्ट्र 14 न्यूज : स्थावर मालमत्तेशी संबंधित खरेदी, विक्री, भाडेकरार अशा स्वरुपाच्या करारांसाठी दस्तऐवजांवर ३१ मार्च २०२१ पर्यंत सर्व संबंधित पक्षकारांनी सही (स्वाक्षरी) केली तरच करारावरील मुद्रांक शुल्कात (स्टँप ड्युटी) सवलत मिळेल. सवलतीचा लाभ घेऊन तयार केलेल्या दस्तऐवजांची नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्यासाठी सही केल्याच्या दिवसापासून पुढे जास्तीत जास्त चार महिन्यांची मुभा आहे. यामुळे दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी निबंधक कार्यालयात गर्दी करु नये, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केले आहे. वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने १ जानेवारी २०२१ पासून ३१ मार्च २०२१ पर्यंत राज्यासाठी देय मुद्रांक शुल्काचा दर पाच टक्क्यांवरुन तीन टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्थावर मालमत्तेशी संबंधित खरेदी, विक्री, भाडेकरार अशा स्वरुपाच्या करारांसाठी दस्तऐवजांवर ३१ मार्च २०२१ पर्यंत सर्व संबंधित पक्षकारांनी सही (स्वाक्षरी) करणे आवश्यक आहे. अथवा ३१ मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्क भरुन कराराच्या दस्तऐवजांवर सही (स्वाक्षरी) करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण केली तर कराराशी संबंधित पक्षकारांना दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी सही केल्याच्या दिवसापासून पुढे जास्तीत जास्त चार महिन्यांची मुभा मिळेल. यामुळे दगदग टाळून आरामात दस्तऐवजांची नोंदणी करणे शक्य होणार आहे.
महाराष्ट्र शासनाने १ सप्टेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत राज्यासाठी देय मुद्रांक शुल्काचा दर पाच टक्क्यांवरुन दोन टक्क्यांवर आणला. यानंतर १ जानेवारी २०२१ पासून ३१ मार्च २०२१ पर्यंत राज्यासाठी देय मुद्रांक शुल्काचा दर तीन टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोनाचा प्रार्दूभाव वाढत आहे. यामुळेच निबंधक कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनाने नोंदणीसाठी मुदत देऊन नागरिकांना एकदम गर्दी करणे टाळा; असे आवाहन केले आहे
9 Comments