महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या चर्चने महानगरपालिका वर्तुळात जोर धरला आहे. यापूर्वी अनुसूचित जातीच्या चेह-यांना दोनवेळा संधी देण्यात आली. तर, ब्राम्हण आणि ओबीसी (माळी) समाजाला प्रत्येकी एकवेळा सभापती पदावर संधी दिली गेली. आता मराठा चेहरा म्हणून भाजप कोणाला संधी देतंय याकरीता विविध गटांमध्ये मोठा सत्तासंघर्ष सुरू आहे.
भाजपचे शहराध्यक्ष महेशदादांनी ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून त्यांच्या गटातील माळी समाजाचे संतोष लोंढे यांना संधी दिली. त्यांचा कार्यकाळ आता संपत आला आहे. आता २०२१ या सत्ताधारी भाजपच्या शेवटच्या वर्षात मराठा समाजाला संधी देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे भाऊंनी यावर्षातील स्थायीच्या सभापती पदावर संधी देण्याचा अधिकार स्वतःकडे राखीव ठेवल्याची माहिती राजकीय वर्तुळात आहे.
नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत भोसरीसह चिंचवडच्या नवीन चार नगरसेवकांना स्थायी समिती सदस्य पदावर संधी दिली आहे. यात नितीन लांडगे, रवी लांडगे, शत्रुघ्न काटे आणि सुरेश भोईर यांची निवड झाली. आता कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते आणि महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणत्या गटाकडे जातात याकडे पिंपरी चिंचवडकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
महापालिका पंचवार्षिक निवडणूक २०२२ ला आहे, हे शेवटचे वर्ष असल्याने महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीत अध्यक्ष होण्यासाठी प्रत्येक सदस्याने आपली ताकद लावली आहे, परंतु शहराचे कर्तेधरते भाऊ-दादा काय निर्णय घेतात ते औत्सुक्याचे ठरणार आहे.
सध्यातरी भाजपातील जुने निष्ठावंत तसेच युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष रवी लांडगे यांचे नाव सभापती पदाच्या रेसमध्ये आघाडीवर आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी रवी लांडगे यांची वर्णी लावण्यासाठी भाजपातील जुना गट एकत्र आला असून आमदार महेश लांडगे गटाकडून देखील जोरबैठकाची वर्दळ वाढली आहे.
माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचे चिरंजीव भोसरीतील नितीन लांडगे यांच्या नावानेही अचानक आघाडी घेतली आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचे ते चिरंजीव असल्यामुळे व गेल्या ४ वर्षात त्यांना देखील कुठलेही पद मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या नावाला पाठींबा मिळू शकतो. तसेच भाजपकडून स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सुरेश भोईर हे देखील प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपच्या गटातटातील सत्तासंघर्षाच्या लढाईत सर्वात शेवटी पाठीमागे महापौर पदावर वर्णी लागत असताना केवळ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी माघार घेतलेले शत्रुघ्न काटे यांना देखील संधी दिली जाते का हे पाहणे औत्सुक्यचे ठरणार आहे. शांत संयमी नेतृत्व म्हणून देखील त्यांच्या नावाची निवड होऊ शकते. परंतु सध्या तरी शांत बसून नेते काय निर्णय घेतात, यावर आपले भविष्य सोपवून आपल्या प्रभागातील नागरिकांच्या कामांकडे शत्रुघ्न काटे लक्ष देऊन आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात पिंपरी चिंचवड मधील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
250 Comments