महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मार्च) : महिला ही सर्वार्थाने सक्षम असल्याने ती कर्तृत्व घडवू शकते पण सर्वप्रथम महिलांनी महिलांचा सन्मान करायला शिकले पाहिजे, असा संदेश मा. अजितदादा पवार यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनेत्रावहिनी पवार यांनी आज दक्षिण पुण्यात येऊन दिली.
निमित्त ठरले, आपल्या ऐश्वर्य कट्ट्यावर रंगलेल्या बहारदार मुलाखतीचे! आजच्या ऐश्वर्य कट्ट्यावर त्यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार मा. श्री. भीमराव तापकीर, रुपालीताई चाकणकर, मा. दीपकभाऊ मानकर, दत्ताभाऊ धनकवडे, वर्षा तापकीर, अश्विनी भागवत, सुनील चांदेरे, दत्ताभाऊ सागरे ,युवराज बेलदरे ,अभय मांढरे, युवराज वासवंड, निलेश अण्णा ढमढेरे, युवराज रेणुसे, सागर भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. सुनेत्रावहिनी येणार म्हणून आजच्या कट्ट्याला महिलावर्ग गुलाबी फेटे परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित होता. सुनेत्रावहिनींचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात आणि बँडबाजाच्या सुमधूर आवाजात व फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आले.
दक्षिण पुण्यात त्या पहिल्यांदाच येत असल्याने गप्पांच्या मैफिलीतून त्यांचा जीवनपट उलगडावा आणि त्यांच्या विलक्षण कर्तृत्वाचा आलेख जगासमोर आणावा म्हणून सुनेत्रावहिनींशी मुलाखतीद्वारे जाहीर संवाद साधण्यात आला. दिलीप जगताप, पराग पोतदार, सचिन डिंबळे यांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली.
सुनेत्रावहिनी तुम आगे बढो…च्या घोषणा देत टाळ्या वाजून महिलांनी सुनेत्रावहिनींना उत्स्फूर्तपणे दाद दिली. सुनेत्रावहिनींच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांतील त्यांच्या उत्तुंग अशा कर्तृत्वाचा आलेख या निमित्ताने सर्वांसमोर उलगडला. अजितदादांच्या सुविद्य पत्नी म्हणून गेली चाळीस वर्षे संसाराची बाजू समर्थपणे सांभाळताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाचे पंख आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विस्तारलेले आहेत ही माहिती समजल्यानंतर उपस्थित जनसमुदायही थक्क झाला. एक कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्व आपल्याशी संवाद साधते आहे याचा आनंद सगळ्यांनाच झाला.
सर्वांशी संवाद साधताना सुनेत्रावहिनी म्हणाल्या, गेल्या चाळीस वर्षांपासून पडद्यामागे राहून मी घराची व कुटुंबाची जबाबदारी आनंदाने सांभाळली. राजकीय पार्श्वभूमी माहेरी आणि सासरी दोन्हीकडे असली तरी राजकारणापासून आजवर दूर राहिले. पण समाजकारणात मी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मी काटेवाडी या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. या गावाला आदर्श गाव म्हणून राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार प्राप्त झाला आणि आज इको व्हिलेज म्हणून या गावाची ओळख प्रस्थापित झालेली आहे. गावातील महिलांना रोजगाराच्या चांगल्या संधी आणि सन्मानाचे जीवन मिळवून देता यावे म्हणून टेक्सटाईल पार्कची चेअरमन या नात्याने महिलांना नेहमीच प्राधान्य दिले.
आज साडेतीन हजारांहून अधिक महिला इथे काम करीत आहेत. विद्या प्रतिष्ठानची धुरा सांभाळत असताना पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर जाण्याची संधी मिळाली. सातत्याने तीन वेळा सिनेटवर काम करून विद्यापीठाशी संबंधित विविध प्रश्नांना वाचा फोडता आली. सेंद्रीय शेतीला प्राधान्य देऊन त्यात जागरुकता निर्माण करून कृषी क्षेत्रातही योगदान दिले. सार्क परिषदेमध्ये जाऊन तिथेही भाषण करण्याची संधी मिळाली. फ्रांन्समधील एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या थिंक टँकवरही कार्यरत आहे. अशी चौफेर कामगिरी करून झाल्यानंतर आता राजकारणाच्या मैदानात पाऊल ठेवते आहे. जिथे जिथे जाते तिथे खूप उत्साहाने स्वागत होते आहे. त्यामुळे लोकांनी विश्वास दाखवून संधी दिली तर काय काम करू शकते हे सिद्ध करून दाखवता येईल. आजच्या घडीला महिला विविध क्षेत्रांत मोकळेपणाने कार्यरत असल्या तरीदेखील त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी पावले मी नक्की टाकीन. आपल्या सर्वांचा विश्वास आणि पाठिंब्याच्या बळावर जर लोकसभेत खासदार म्हणून जाण्याची संधी मिळाली तर महिलांची सुरक्षा आणि त्यांचे सक्षमीकरण या विषयावर नक्की काम करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या वेळी अजितदादांसमवेतचे सहजीवनाचे नातेही त्यांनी अगदी दिलखुलासपणाने उलगडले. दादांचे आवडते गाणे, दादांचा फिटनेस, एकत्र पाहिलेला चित्रपट, आवडते खाद्य, दादांचा दिनक्रम, त्यांचा विनोदी स्वभाव असे अनेक एरवी न उलगडलेले पैलू उपस्थितांना ऐकायला मिळाले आणि मुलाखत उत्तरोत्तर रंगत केली. आणि सुनेत्रावहिनी यांचे सहजीवनाचे नातेही त्यांनी उलगडले.
सुमारे तासभर रंगलेल्या मुलाखतीनंतर सुनेत्रावहिनींसमवेत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली. कार्यक्रमाचा समारोप प्रख्यात गायक जितेंद्र भुरूक व दीपकभाऊ मानकर यांनी बहारदार गीत सादर करून केला. यावेळी आप्पा रेणूसे मित्रपरिवार अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होता.