महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ ऑक्टोबर) : फडणवीस सरकारमधील प्रशाकीय मोठे फेरबदल पुन्हा एकदा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.सूत्रांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं की दिवाळी संपल्यावर पुन्हा एकदा मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात येणार आहेत. प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, राज्यातील मोठ्या महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी पदावर मोठे फेरबदल होणार आहेत.
यासोबतच मंत्रालयातील महसूल, गृह, वित्त, सार्वाजानिक बांधकाम विभागाचे सचिव दर्जाचे अधिकारी यांच्याही बदल्या होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. यात पुणे , नाशिक, नागपूर, अमरावती, सोलापूर, अकोला जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांसह राज्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. डीआयजी, आयजी, पोलीस आयुक्त पदावर मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील काही दिवसातच हे मोठे फेरबदल होणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रमुख चर्चा झाली आहे.
याआधी दिवाळीपूर्वीही शिंदे-फडणवीस सरकारकडून मोठे फेरबदल करण्यात आले होते. शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशी चर्चा रंगली होती. याबाबत गृह मंत्रालयाने 20 ऑक्टोबर रोजी अचानक आदेश काढले. यावेळी पोलीस दलातील मोठे फेरबदल करण्यात आले. राज्यातील 23 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आणि राज्य पोलीस सेवेतील दोन अशा 25 अधिकाऱ्यांच्या नवीन बदल्या करण्यात आल्या होत्या.