महाराष्ट्र 14 न्यूज,( दि.५मार्च ) : राज्यातील कोरोनाचा धोका आता दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनानं वेग धरला तो आता काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत चालला आहे. राज्यातील नव्या कोरोना रुग्णांनी सुरुवातीला 8 हजार, मग 9 हजार आणि आता तर 10 हजारांचा आकडा ओलांडला आहे. अवघ्या काही दिवसांत राज्यातील कोरोना रुग्ण भरभर वाढू लागले आहेत.
राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 05 मार्चला दिवसभरात तब्बल 10 हजार 216 रुग्ण सापडले आहेत. तर 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत ते मुंबई आणि नागपुरात. दोन्ही ठिकाणी एक हजारपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई आणि नागपुरात अनुक्रमे 1,174 आणि 1,225 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
सध्या 88,800 पेक्षा जास्त अॅक्टिव्ह म्हणजे उपचार घेत असलेले रुग्ण आहे. अॅक्टिव्ह रुग्णांचा विचार करता पुण्यात सर्वात जास्त रुग्ण आहेत तर त्यापाठोपाठ नागपूर, ठाणे आणि मुंबईचा नंबर लागतो. पुण्यात 18 हजार तर नागपुरात 11 हजारपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबई-ठाण्यात 9 हजार रुग्ण आहेत. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय? अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
🔴राज्यातील 05 मार्चची कोरोना रुग्णांची आकडेवारी
एकूण रुग्ण – 21,98,399
उपचार घेत असलेले रुग्ण – 88,838
दिवसभरातील नवे रुग्ण – 10,216
दिवसभरात बरे झालेले रुग्ण – 6,467
एकूण बरे झालेले रुग्ण – 20,55,951
रुग्ण बरे होण्याचं प्रमाण – 93.52%
दिवसभरातील मृत्यू – 53
मृत्यूचं प्रमाण – 2.38%
1 Comment