महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली.
राज्यात जरी शाळा सुरु होणार असल्या तरी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणमध्ये जरी आला असला तरी अन्य देशांमधील कोरोनाची दुसरी लाट व अन्य राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता मुंबईतील शाळा या 16 जानेवारीपासून पुढील आयुक्तांचे आदेश मिळेपर्यत बंद राहतील, असं मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढून सांगण्यात आलं आहे.
शालेय शिक्षण मंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि शिक्षणाची गुणवत्ता यामध्ये वाढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभुत सुविधांसाठी शालेय शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण रोखणे, 5 हजार आदर्श शाळांची निर्मिती करणे, शिक्षक भरती यासारखे उद्दिष्ट असलेले शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन 2025 चे सादरीकरण शालेय शिक्षण विभागामार्फत आज करण्यात आले. परफॉर्मन्स ग्रेडिग इंडेक्समध्ये सुधारणा करण्यासाठी, शिक्षकांचे उत्तरदायित्व वाढविणे, शासन निर्णय, कायद्यांचे फेरनिरीक्षण व सुलभीकरण करणे, गुणवत्तेवर आधारीत मुख्याध्यापकांची भरती करणे यासारख्या उपाययोजना करणार असल्याची माहितीही सादरीकरणादरम्यान प्रा. गायकवाड यांनी दिली.
621 Comments