महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ऑगस्ट) : भारत आज आपला 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशवासियांना शुभेच्छा दिल्या. देशाला संबोधित करताना मोदींनी अनेक घोषणा केल्या. नरेंद्र मोदींनी शिक्षण क्षेत्रा संदर्भात एक मोठा निर्णय घेतल्याचं जाहीर केलेय. देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
“आज मी देशवासियांसोबत एक आनंदाची गोष्ट शेअर करत आहे. देशातील लाखो मुलींकडून संदेश येत असत की त्यांनाही सैनिक शाळेत शिकण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठीही सैनिक शाळांचे दरवाजे उघडले पाहिजेत, या दृष्टीनं देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश घेता येईल, असं मोदी म्हणाले. अडीच वर्षांपूर्वी मिझोरामच्या सैनिक शाळेत मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय झाला होता.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नवीन शिक्षण धोरणावर देखील भाष्य केलं. नवीन शिक्षण धोरण दारिद्र्याविरुद्ध लढण्यासाठी बनवण्यात आले आहे. भाषेच्या अडचणीमुळे अनेकांची प्रतिभा पिंजऱ्यात बांधली गेली. 21 व्या शतकातील गरजा पूर्ण करण्यासाठी आज देशाकडे नवीन ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ आहे. “जेव्हा गरीबांची मुलगी, गरीबांचा मुलगा मातृभाषेत शिक्षण घेऊन व्यावसायिक होईल, तेव्हा त्यांच्या क्षमतेला न्याय मिळेल. मी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण हे दारिद्र्याविरुद्धच्या लढाईचे एक साधन मानतो”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
🇮🇳75 वंदे भारत ट्रेन्सची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणावेळी देशभरात वंदे भारत ट्रेन्स सुरु करण्याची घोषणा केली. त्यानुसार येत्या 75 आठवड्यात रेल्वे विभागाकडून 75 वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येतील. या ट्रेन्स भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन संपूर्ण देश जोडतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
7 Comments