महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ऑगस्ट) : जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) मुख्य वैज्ञानिक डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी भारतातील कोरोना स्थितीवर महत्त्वाची निरिक्षणं नोंदवली आहेत.
सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी आगामी काळात कोविड -19 च्या तिसऱ्या लाटेचाही अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे अनेकजण चिंतेत आहेत. यावर डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या, “सध्या भारतात कोरोना अशा स्थितीत आहे ज्यात विषाणूचा संसर्ग मध्यम किंवा अगदी सौम्य असतो. अशी स्थिती त्या भागातील लोक विषाणूसोबत राहण्यास शिकल्यानंतर येते. ही स्थिती तिसऱ्या लाटेपेक्षा बरीच वेगळी आहे.
भारताची कोरोना लस कोवॅक्सिनला मंजुरी देण्यावर स्वामीनाथन म्हणाल्या, “WHO च्या तांत्रिक गट कोव्हॅक्सिनला मंजुरी देण्याबाबत संतुष्ट असेल असा मला विश्वास आहे. ही सर्व प्रक्रिया सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण होऊ शकते.” पत्रकार करण थापर यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत स्वामीनाथन म्हणाल्या, “भारताचा आकार, देशातील विविध भागात राहणारी लोकसंख्या आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पाहता कोरोनाची स्थिती याच प्रकारे पुढेही कायम राहिल असं वाटतंय. देशाच्या वेगवेगळ्या भागात कोरोना रुग्णांच्या संख्या चढउतार सुरू आहेत.”
▶️70 टक्के लसीकरणाचं लक्ष्य
“भारत एका स्थानिकतेच्या स्थितीत प्रवेश करतोय. यात कोरोना संसर्ग अगदी कमी किंवा मध्यम स्थितीत संसर्ग करतोय. मात्र, काही दिवसांपूर्वी आम्ही कोरोना संसर्गाचा जो घातक स्तर आणि पिक पॉईंट पाहिला होता तो आत्ता दिसत नाहीये. 2022 च्या अखेरप्यंत भारतात 70 टक्के लसीकरणाचं ध्येय गाठलेलं असेल अशी आशा आहे. त्यावेळी देशातील स्थिती सामान्य होईल,” असंही त्यांनी नमूद केलं.
▶️आई-वडिलांनी लहान मुलांबाबत घाबरण्याची गरज नाही
लहान मुलांना असलेल्या कोरोना संसर्गाच्या धोक्यावर बोलताना स्वामीनाथन यांनी आई-वडिलांनी घाबरुन जाण्याची गरज नसल्याचं म्हटलं. त्या म्हणाल्या, “आम्ही सीरो सर्वेक्षणाची पाहणी करत आहोत आणि इतर देशांकडून जे शिकलोय त्यावरुन लहान मुलांमध्ये कोरोनाचा सौम्य प्रकारचा संसर्ग दिसतो आहे.”
21 Comments